१९९२ पासूनच्या सूचना प्रशासनाकडे धूळ खात पडल्या - पालिका सहगृह तहकूब - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

१९९२ पासूनच्या सूचना प्रशासनाकडे धूळ खात पडल्या - पालिका सहगृह तहकूब

Share This
मुंबई (प्रतिनिधी) - मुंबईकर नागरिकांच्या फायद्यासाठी नगरसेवकांनी अभ्यास करून मांडलेल्या ठरावांच्या सूचना प्रशासनाकडे १९९२ पासून धूळखात पडून आहेत. अनेक नगरसेवकांचा कार्यकाळ संपला, काहींचे निधन झाले तरी प्रशासनाकडून त्यावर अभिप्राय दिला जात नाही. संविधान आणि कायद्याने दिलेले अधिकार पालिका प्रशासनाने बोथट केले आहेत. असे आरोप करत गुरुवारी नगरसेवकांनी सभागृहात प्रशासनावर ताशेरे ओढत नगरसेवकांच्या अधिकारावर गदा आणण्याच्या प्रकारा विरोधात आणि मुस्कटदाबी विरोधात पालिका सभागृह तहकूब करण्यात आले. 

नागरिकांच्या हिताबाबत नगरसेवक विविध सूचना मांडत असतात. प्रशासनाने त्यावर अभिप्राय देऊन त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असते. मात्र गेल्या २४ वर्षांपासून अनेक नगरसेवकांच्या चांगल्या व नागरिकांच्या हिताच्या सूचना धूळखात पडल्या आहेत, काही सूचनांना केराची टोपली दाखवली गेली आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात गुरुवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आवाज उठवला. या ठरावाच्या सूचनांना ठराविक कालावधीतच उत्तरे मिळाली पाहिजेत, अशी सूचना डॉ. सईदा खान यांनी मांडली होती.

२०१२ मध्ये पालिका निवडणुकीनंतर आताचा युतीचा कार्यकाळ सुरू झाल्यापासून तब्बल ३४० सूचनांवर अभिप्राय दिलेले नाहीत, अश माहिती भाजपचे दिलीप पटेल यांनी दिली. ९५ टक्के सूचनांना नकारार्थी उत्तर दिल्याचा आरोप डॉ. शुभा राऊळ यांनी केला. ठरावाच्या सूचनांवर प्रशासनाने दोन महिन्यांत उत्तर द्यावे अशी मागणी अवकाश जाधव यांनी केली.

नगरसेवकांनी मांडलेल्या ठरावांच्या सूचनांबाबत योग्य तो पाठपुरावा करून योग्य त्या कालावधीत उत्तरे प्राप्त होण्यासाठी एका उपायुक्ताची नेमणूक करावी अशी सूचना यावेळी झालेल्या चर्चेत सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी केली. ठरावाच्या सूचनांवर अभिप्राय देण्यास दिरंगाई करणारे विधी खाते बरखास्त करा अशी मागणी ऍड. मेहराज शेख यांनी केली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages