मुंबई (प्रतिनिधी) - मुंबईतील नाले सफाईची कामे करताना ठेकेदार जी आकडेवारी देत आहे त्यामध्ये पारदर्शकता दिसुन येत नाही. नाल्यातून काढलेल्या गाळाच्या वजन काट्यावरील पावत्या अनेक ठेकेदार दाखवत नाहीत. त्यामुळे यात पारदर्शकता नाही. आता या प्रकरणी भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका प्रशासनाला जाब विचारतील. अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी दिली.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आणि उपमहापौर अलका केरकर यांनी पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नालेसफाईची सलग दोन दिवस पाहणी केली. पालिका अधिकारयांच्या उपस्थितीत काल २० मे रोजी मिठी नदी, कामगार नगर, माहूल खाडी, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथील देवनार नाला, सोमय्या नाला, लक्ष्मीबाग नाला, नाहूर नाला, नानेपाडा नाला या नाल्यांची पहाणी केली.
तर आज पश्चिम उपनगरातील गझदर बांध येथील एसएनडीटी नाला येथून दुपारी दोन वाजता या पाहणी दौऱयाला सुरूवात झाली यानंतर अंधेरी येथील इरला नाला, मोगरा नाला, गोरगाव येथील पिरॅमल नाला, मालाड लिंक रोड येथील रामचंद्र नाला, बोरीवली येथील म्हात्रे नाला यासह दहिसर आणि पोयसर नदीची पाहणी करण्यात आली.
या दौऱयात विधी समिती अध्यक्ष महेश पारकर, सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, आरोग्य समिती अध्यक्ष सुनिता यादव, नगरसेवक ज्ञानमुर्ती शर्मा, दिलीप पटेल, राम बारोट, राजश्री शिरवाडकर, समिता कांबळे आणि आमदार मनिषा चौधरी आदी नगरसेवक सहभागी झाले होते.
नाल्यातून काढलेला गाळ कोणत्या वजन काट्यावर मोजता? त्याच्या पावत्या दाखवा? ज्या वजन काट्यावर हा गाळ मोजला जातो त्या काट्यावर फोन करून त्याची पडताळनी करीत आमदार शेलार यांनी जी आकडेवारी कंत्राटदार सांगत आहेत त्याची सत्यता तपासून पाहण्याचा प्रयत्न या वेळी केला. अनेक कंत्राटदरानं पावत्या दाखविण्यात असमर्थता दर्शविली. तर काही वजन काट्यावरील फोन लागत नाहीत त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियत पार पारदर्शकता नसल्याचे आमदार आशिष शेलार यांच्या निदर्शनास आले समाधान व्यक्त् करावे अशी कामे झालेली नाहीत . आता या प्रकरणी भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका प्रशासनाला जाब विचारतील.
या संपूर्ण कामाचे नियोजन महापालिका अधिकर्यांनी चांगल्या पद्धतीने केले असले तरी कंत्राटदार ज्यापद्धतीनेकाम करत आहेत त्या मध्ये शका घेण्यात वाव आहे. स्वभाविक पणे मुंबईकरांच्या वतीने भाजपा नगरसेवक आणि पदाधिकारी प्रशासनाला विचारतील आणि त्याचे उत्तर महापालिका प्रशासन देईल अशी अपेक्षा यावेळी आमदार शेलार यांनी व्यक्त केली. दरम्यान पावसाळा सुरु होई पर्यंत कंत्राटदारांची कामे नियमित सुरु आहेत कि नाही यावर प्रशासनाच्या अधिका-यासोबत भाजपा नगरसेवकांनी हि लक्ष ठेवावे असे निर्देश त्यांनी दिले.

