अमीन यांची मृत्यूशी लढाई संपली
मुंबई / अजेयकुमार जाधव
काळबादेवी येथे शनिवारी गोकुळ निवास इमारतीला भीषण आग लागली होती. हि आग विझवताना मुंबई अग्निशमन दलातील उप मुख्य अधिकारी सुधीर अमीन आगीमध्ये होरपळून निघाले होते. ६ दिवस मृत्यूशी झुंज दिल्या नंतर अखेर गुरवारी सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी ऐरोली येथील रुग्णालयात अमीन यांचे निधन झाले. अमीन यांचे मृत्यूसमयी वय ४९ वर्षे होते. काळबादेवी आगीमध्ये मृत्यू मुखी पडणारे अमीन हे ३ रे अधिकारी आहेत.
काळबादेवी येथील लागलेल्या आगी मध्ये आपलं कर्तव्य बजावत असतांना अग्निशमन दलाचे अधिकारी संजय वामन राणे आणि महेंद्र देसाई यांना वीरमरण आले होते. अग्निशमन दलातील या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू इमारतीच्या ढिगाऱ्या खाली अडकल्याने झाला होता. याच आगी मध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर आणि उपमुख्य अधिकारी सुधीर अमीन हे सुद्धा गंभीर जखमी झाले होते. नेसरीकर ४० टक्के तर अमीन हे ९० टक्के भाजले होते. या दोघांवर नवी मुंबई मधील न्याशनल बर्न हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते. अमीन यांच्यावर उपचारादरम्यान ४ शस्त्रक्रिया झाल्या होत्या. परंतू अमीन हे ९० टक्के भाजले असल्याने त्यांचे शरीर उपचाराला साथ देत नव्हते. अखेर गुरुवारी अमीन यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. काळबादेवी आगी मध्ये अग्निशमन दलाचे बळी पडलेले तिसरे अधिकारी आहेत. अमीन यांनी २६ / ११ च्या हल्ल्यामध्ये केलेल्या कामा बाबत त्यांना राष्ट्रपती पदक देण्यात आले होते. अंधेरी येथील लोटस पार्क येथील आगी मध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केले होते. १९८९ ला अग्निशमन दलामध्ये कामाब्वर रुजू झाले. त्यांनी भायखळा, चेंबूर, बांद्रा, सायन येथील अग्निशमन दलाच्या केंद्रामध्ये काम केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अमीन यांच्या दोन्ही मुलांचे सध्या शिक्षण सुरु आहे.
काळबादेवीतील गोकुळ निवास इमारतीला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या तीन अग्निशमन दलाचे जवान शहिद झाल्याच्या घटनेनंतर अशा गजबजलेल्या परिसरातील जुन्या इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील आठ वर्षात मुंबईत ३२६ इमारती विविध कारणाने कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यावेळी आपले कर्तव्य बजावताना सात जवानाना शहीद व्हावे लागले आहे. तर १९ पेक्षा अधिक जवान जखमी झाले आहेत.

