मुंबई- बोगदा चाळीतील रहिवाशांना येत्या सात दिवसांत पर्यायी जागेची व्यवस्था केली नाही तर प्रचंड आंदोलन हातात घेतले जाईल आणि त्याची सगळी जबाबदारी महापालिका प्रशासनावर राहील, असा सक्त इशारा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला. गेला महिनाभर बोगदा चाळीतील रहिवासी त्यांची चाळ वाचवण्याकरिता आणि पर्यायी जागा मिळण्याकरिता साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन करीत आहेत.
नारायण राणे यांनी सांगितले की, ‘मी स्वत: बोगदा चाळ वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सर्व सदस्यांशी आझाद मैदानावर जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांची चाळ मी विकासकाच्या घशात घालू देणार नाही. पर्यायी जागा दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असे आश्वासन मी त्यावेळी दिले होते. महापालिका प्रशासनाला जवळपास तीन आठवडयांची संधी मिळालेली आहे. त्या तीन आठवडयांत प्रशासनाने बोगदा चाळ रहिवाशांसाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही. गेले सहा दिवस मुंबईत धुवाधार पाऊस कोळसत आहे. बोगदा चाळ रहिवासी रस्त्यावर आहेत. त्यांच्या मुलाबाळांचे हाल होत आहेत. महापालिका प्रशासन किंवा मातोश्रीच्या कोणालाही याबद्दल कसलीही खंत वाटत नाही आणि म्हणून येत्या सात दिवसांत पर्यायी व्यवस्था करून या बोगदा चाळीतील रहिवाशांना आसरा मिळाला नाही तर मी स्वत: या लढय़ाचे नेतृत्व करून बोगदा चाळवासीयांसाठी रस्त्यावर उतरेन, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे. बोगदा चाळ एका विकासकाच्या घशात घालण्याचे कारस्थान मातोश्रीवरून शिजले आहे, असा स्पष्ट आरोप बोगदा चाळ रहिवाशांचे नेते किशोर जगताप यांनी यापूर्वीच केला आहे

