मुंबई / प्रतिनिधी - मुंबईची लोकसंख्या वाढत असून त्या तुलनेत पाणीपुरवठा कमी प्रमाणात केला जात आहे. मुंबईकर नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याने पाण्याचे इतर स्त्रोत शोधणे गरजेचे आहे. या अनुषंगाने मुंबई महानगर पालिकेच्या उद्यानात बोअरवेल बांधण्यात याव्यात अशी मागणी नगरसेविका शुभा राउळ यांनी जून २००६ मध्ये व २००७ मध्ये ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती. या ठरावाच्या सूचनेबाबत तब्बल ८ वर्षानी अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. या ठरावाच्या सुचने नुसार पालिकेच्या उद्यानात बोअरवेल बांधण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर सदर करण्यात आला आहे.
मुंबईकर नागरिकांना पाण्याचा अपुरा पाणीपुरवठा होत असताना याच पाण्यामधून उद्याने, रेल्वे यार्ड, गोदी यामध्ये लाखो लिटर पिण्याचे पाणी गाड्या धुणे झाडांना देण्यात वाया जाते. यामुळे अमुल्य आणि शुद्ध पाण्याचा अपव्यय होत असतो. मुंबई मध्ये १० ते १५ फुट जमीन खोदल्यास भरपूर प्रमाणात पाणी मिळू शकते. हि वस्तुस्तिथी असल्याने महापालिकेच्या सर्व उद्यानात बोअरवेल बांधाव्यात असा प्रस्ताव शुभा राउळ यांनी सादर केला होता. जल अभियंता विभागामार्फत विशेष निधीची तरतूद करून पालिकेच्या कार्यालयांमध्ये १८९ बोअरवेल खोदण्यात आल्या असून त्यापैकी २३ बोअरवेल पालिकेच्या उद्यानात आहेत. या प्रस्तावावर अभिप्राय देताना पालिका आयुक्तांनी फ्लशिंग, बागकाम, गाड्या धुणे या करिता बोअरवेल मधील पाण्याचा जास्तीत जास्त वापर करावा तसेच संबंधित कार्यालयांनी बोअरवेल लावण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, मुंबई बंदर (गोदी) यांनी देखील बोअरवेलच्या माध्यमाने दुय्यम कामांची गरज भागवावी असे म्हटले आहे. या प्रस्तावाला येत्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

