मुंबई (प्रतिनिधी)- लोकप्रतिनिधींना महापालिकेचे बोधचिन्ह देवू नये, असे अभिप्राय देणाऱ्या पालिका प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेची मुस्कटदाबी करीत भाजपाने झटपट सभा तहकूब केली. त्यामुळे हैराण झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उघड नाराजी व्यक्त केली. यावेळी मागील सहा महिन्यापासून भाजप वेगळे राजकारण करीत असल्याची कबूली दिली. यावरून आगामी पालिका निवडणूकांसाठी भाजपाने वेगळी मोर्चे बांधणी सुरू केल्याची चर्चा पालिकेत सुरू होती.
महापालिका मुंबईकरांच्या सेवेत अविरहीत कार्यरत आहे. पालिकेचे बोधचिन्ह हे वैशिष्ट्ये पूर्ण आहे. चार भागातील हे सौदर्यांचे प्रतिक आहे. हे प्रतिक पालिकेमध्ये निवडून येणाऱ्या नगरसेवकांना बोधचिन्ह म्हणून सन्मानित करावे, अशी ठरावाची सूचना यशोधर फणसे यांनी एप्रिल 2013 मध्ये केली होती. या सुचनेवर पालिकेने अभिप्राय देताना असे म्हटले की, नगरसेवकांना महापालिका किंवा शासनाचे बोधचिन्ह देवून त्यांचा सन्मान करण्याची कोठेही प्रथा नाही. केवळ ते नगरसेवक असले म्हणून त्यांना बोधचिन्ह देणे योग्य नाही, असे स्पष्टीकरण दिले. आयुक्तांच्या या अभिप्रायावर नगरसेवकांनी विधी समितीमध्ये नाराजी व्यक्त केली. तसेच नगरसेवकांना अपमान झाला असून प्रस्तावाबाबत खुलासा देण्याची मागणी मनसेचे मामा लांडे यांनी केली. तर भाजपाचे नगरसेवक ज्ञानमुर्ती शर्मा यांनी झटपट सभा तहकूबी मांडली. याला मनसेने अनुमोदन दिल्याने समिती अध्यक्ष कृष्णा पारकर यांनी सभा तहकूब केली. मात्र, शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांना बोलायचे असतानाही सभा तहकूब केल्यामुळे पेडणेकर हैराण झाले. त्यांनी समिती सभागृहाबाहेर ही नाराजी व्यक्त केली. यावेळी मागील सहा महिन्यापासून भाजप वेगळे राजकारण करीत असल्याचा आरोप केला.

