मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणार्या अधिकार्यांवर कारवाई करामुंबई (प्रतिनिधी) - स्मशानभूमीत सरणाची लाकडे मोफत मिळावी म्हणून पालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना ३० खासगी स्मशानभूमींत मात्र २००८ पासून मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळले जात असल्याचे उघडकीस आले आहे. पालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे मेल्यानंतरही नागरिकांची भ्रष्टाचारातून सुटका होत नाही. मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी म्हणून शिवसेना आवाज उठवणार आहे.
मुंबईतील सर्व खासगी व पालिकेच्या स्मशानभूमीमध्ये सरणाची लाकडे मोफत दिली जातात. मात्र ३८ खासगी स्मशानभूमींपैकी ३० ठिकाणी सरणाच्या लाकडांचे पैसे घेतले असल्याचे उघडकीस आले आहे. लेखा परीक्षा अहवालामध्ये या विषयावर आक्षेप नोंदवण्यात आला होता. २००८ पासून या ३० स्मशानभूमींमध्ये पैसे घेतले जात असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिवेसेनेच्या नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी केली आहे. वरळी स्मशानभूमीत सरणाची लाकडे मोफत मिळत नव्हती. मात्र २०१२ पासून पाठपुरावा केल्यानंतर जानेवारी २०१५ पासून इथे मोफत लाकडे मिळू लागली, अशी माहिती हेमांगी वरळीकर यांनी दिली. मात्र याच पद्धतीने ३० स्मशानभूमींमध्ये जर मोफत लाकडे मिळत नसतील तर संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

