मुंबई (प्रतिनिधी)- मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या, शहरासह उपनगरातील सुमारे 542 इमारती या अतिधोकादायक आहेत. या इमारतींना नोटीसा बजावण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई पालिकेने केलेली नाही. त्यामुळे या इमारतींमधून राहणार्या रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. मात्र, पालिका प्रशासन रहिवाशांनी या इमारती त्वरित खाली करून सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे, केवळ इतकेच आवाहन करण्यावर भर देत आहे.
शहराच्या एल वॉर्डमधील कुर्ला परिसरात सर्वाधिक 116 इमारती अतिधोकादायक आहेत. तसेच भांडुप, विक्रोळी, माहीम, फोर्ट, या ठिकाणी धोकादायक इमारती अद्याप उभ्याच आहेत. पालिकेने अशा इमारतींमधील रहिवाशांना स्थलांतरीत करण्याच्या नोटिसा दिल्या असल्या तरी बहुतांश रहिवाशी इमारती सोडण्यास तयार नाहीत. इमारती खाली केल्यावर त्यांना इच्छित स्थळी राहण्यासाठी घर दिले जात नाही. शिवाय इमारतींचा पुनर्विकास वर्षानुवर्ष रखडतो. इमारत खाली करतेवेळी रहिवाशांच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याने रहिवाशी सहजासहजी इमारत खाली करण्यास तयार होत नाहीत. यावर पालिकाही कोणती उपाययोजना करीत नसल्याने ही स्थिती कायम असल्याचे काही रहिवाशांचे म्हणणे आहे.

