नालेसफाई चांगली न झाल्याने मुंबईत पाणी तुंबणारच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 June 2015

नालेसफाई चांगली न झाल्याने मुंबईत पाणी तुंबणारच

मुंबई : यंदा नालेसफाई चांगली न झाल्यामुळे मुंबईत नेहमीच्या ठिकाणी पाणी तुंबणारच आहे, असा दावा पालिकेतील भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या वर्षी नालेसफाई चांगली व समाधानकारक झालेली नाही, हे भाजपाने सिद्ध करून दाखवले असताना शिवसेना मात्र नालेसफाई चांगली झाल्याचे सांगत खूश आहे, असाही टोला कोटक यांनी लगावला.
या वर्षी मुंबईत नालेसफाई सुरू झाल्यावर शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्व आणि पश्‍चिमम उपनगरातील काही नाल्यांच्या सफाई कामांची पाहणी करून, त्याबद्दल पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले होते. मात्र काही दिवसांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार अँड़ आशीष शेलार, उपमहापौर अलका केरकर, कोटक यांच्यासह भाजप नगरसेवकांनीही नाल्यांच्या सफाई कामाची पाहणी केली व ते पाहिल्यानंतर असमाधान व्यक्त करून कंत्राटदारांवर टीका केली. नाल्यातून काढलेला गाळ कोणत्या वजनकाट्यावर नेला, नेल्यानंतर तेथे वजन केल्याची पावती दाखवा, कोणत्या नाल्यातून किती गाळ काढला याची आकडेवारी सादर करा, अशी मागणी कंत्राटदारांकडे केली होती, पण ते याबाबत काहीच कागदपत्रे सादर करू शकले नाहीत, असे अँड़ शेलार व कोटक म्हणाले. कोटक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना याचा पुनरुच्चार केला. नालेसफाई समाधानकारक झाल्याचा शिवसेनेचा दावा चुकीचा असून, नालेसफाई चांगली झाली नसल्याचे भाजप पुराव्यानिशी सिद्ध करू शकते, असे कोटक म्हणाले. नाल्यातून काढलेल्या गाळाचे वजन करण्यासाठी 'वजनकाटे'च अस्तित्वात नसल्यामुळे ठेकेदारांनी वजन केले कुठे, असा सवाल त्यांनी केला. यामुळे येत्या पावसाळ्यात मुंबईत नाले व ठिकठिकाणी पाणी तुंबणारच आहे, असे कोटक यांनी ठाम सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS