मुंबई - धारावीतील प्रत्येक रहिवाशाला चारशे चौरस फुटाचे घर मिळेल. धारावी विकासाचा प्रकल्प तीन वर्षात पुर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही सरकारने दिली आहे. सरकारचा हा संदेश घेऊन मी आज धारावीकराना भेटायला आलो आहे, असे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी धारवीत जाहीर केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला एक वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने आज मुंबई भाजपातर्फे धारावी येथे जाहीर सभा घेऊन हा आनंद साजरा करण्यात आला. केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात केलेली कामे आणि धारावी विकासाबाबत राज्यातील सरकारची भूमिका मांडण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. धारावी विधानसभा मतदार संघाचे भाजपा अध्यक्ष मणी बालन यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सभेला प्रमुख वक्ते मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार अॅड आशिष शेलार यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा सविस्तर उहापोह करीत उपस्थितांना माहिती दिली. कॉंग्रेस सरकारच्या काळात गरिबी हटविण्याच्या नुसत्या घोषणा झाल्या पण प्रत्यक्षात काहीच घडले नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार असे सरकार आहे जे खऱया अर्थाने गरिबाचा विचार करते आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी विविध योजना जाहीर केल्या आहेत. गरिब माणसाला विम्याची सुरक्षा देण्यात आली आहे. गरिबाच्या मुलांना शिक्षणासाठी योजना आहेत. त्याला नोकरीसाठी सरकार मदत करण्यात येते आहे. गरिब माणसाला स्वाभिमानाने जगता यावे म्हणून सरकार प्रयत्न करते आहे असे सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली.
कॉंग्रेस आघाडी सरकारने धारावी विकासाच्या घोषणा केल्या पण वीस वर्षात प्रत्यक्षात काहीच घडले नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने धारावी विकासाचा निर्णय घेतला असून धारावी रहिवाशांना चारशे चौरस फुटाचे मोफत घर देण्यात येईल. आजच भाजपाचे शिष्टमंडळ राज्याचे गृहनिर्माण् मंत्री प्रकाश महेता यांना भेटले त्यांनी ही ग्वाही दिली आहे की धारावीचा विकासाचा प्रस्ताव तयार झाला असून पुढील तीन वर्षात हा प्रकल्प पुर्ण होईल, असे नियोजन सरकारकडून करण्यात आले आहे., असेही आमदार अॅड शेलार यांनी यावेळी जाहीर केले

