मुंबई (प्रतिनिधी)- शहरातील नाल्याच्या नावाखाली घोटाळा सुरू आहे. नाल्यात गाळ तसाच असताना सत्ताधारी संपूर्ण नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. यातून मुंबईकरांना उल्लू बनविण्याचे प्रयत्न असून प्रशासन आणि सत्ताधारी गाळातून कोट्यवधीची हातसफाई करीत आहेत, असा आरोप कॉंग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरूपम आणि पालिका विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला. आज पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली.
मुंबईतील नाल्यातून 93 टक्के गाळ काढला आहे, असा छातीठोक दावा पालिकेने केला आहे. मात्र, उपनगरातील नाल्याच्या पाहणीवरून केवळ 25 ते 30 टक्के नालेसफाई झाल्याचे दिसत आहे. मोठ्या नद्यांतून काही प्रमाणात गाळ काढला असला तरी छोटे नाल्यांकडे पालिकेने दुर्लक्ष केला आहे. शहर, उपनगरातील नालेसफाईची ३१ मेपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत रविवारी संपली. त्यामुळे शहरातील नालेसफाईच्या कामाचा कॉंग्रेसने आज आढावा घेतला. ओशिवरा नदीपासून सुरूवात झाली. यावेळी पोईसर नदी, वलनाई नाला, लालजीपाडा नाला, लोखंडवाला नाला आणि बेहराम बाग नाल्यांची पाहणी केली. दरम्यान, नदीपात्रात कचरा तरंगत असल्याचे निर्दशनात आले. तर, छोट्या नाल्यांकडे पालिकेने पार दुर्लक्ष केले आहे. एका महिन्यात ४ लाख घनमिटीर गाळ उचलण्याची आवश्यकता होती. परंतु, निम्माही गाळ काढण्यात आलेला नाही. हा गाळ काढण्यासाठी १ हजार ६०० गाड्यांची गरज आहे. मात्र, पालिकेकडे वाहनेच उपलब्ध नाहीत. फक्त २५ ते ३० टक्के सफाई झाली आहे. त्यामुळे नालेसफाईचा दावा फेल ठरला आहे, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
मुंबईत नऊ हजार मेट्रीक टन कचरा जमा होतो. त्यापैकी सहा हजार कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. तर उर्वरित कचरा तसाच पडून राहतो. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडे जागाच उपलब्ध नाही. तीच स्थिती गाळाबाबत आहे. नालेसफाईवर हजारो कोटी रुपयाची तरतूद केली जाते. मात्र, नाल्याती गाल उपसण्याएवजी त्याची आकडेवारी फुगविली जाते. यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप आंबेरकर यांनी केला. त्यामुळे यंदाची नालेसफाई मुंबईकरांच्या जीवावर बेतनारी आहे. मुंबईकरांनी स्वतः स्वतःचे रक्षण करावे, अशी सूचना निरूपम यांनी केली.

