रहिवाश्यांनी व्यक्त केला संताप
मुंबई / प्रतिनिधी - बोगदा चाळ पाडल्याने गेले साडेतीन महिने रस्त्यावर आलेल्या कुटुंबीयांच्या संतापाचा शुक्रवारी बांध फुटला. बोगदा चाळीतील संतापलेल्या महिलांनी मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्या कार्यालयात दुसऱ्यांदा धडकल्या. ‘‘पावसाळा सुरु होत आहे, पावसाळय़ात आम्ही राहायचे कुठे आमच्या घरांचा प्रश्न सोडवा अशी मागणी करत रहिवाश्यांना रस्त्यावर आणणाऱ्या सत्ताधारी आणि पालिका अधिकाऱ्यांचे वाटोळे होऊ देत असा संताप व्यक्त करण्यात आला.
बोगदा चाळ रहिवाश्यांचा विरोध असतानाही पालिका अधिकारी आणि सत्ताधारी यांच्या खुशीसाठी विशिष्ट बिल्डरच्या फायद्यासाठी पावसाळय़ाच्या तोंडावर चाळ तोडून रहिवाशांना रस्त्यावर आणले आहे. रहिवाशांना बिल्डर किंवा कोणतीही पर्यायी घरे न दिल्याने ते आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. रहिवाश्यांनी या आधीही स्थायी समिती बैठकीवेळी पालिकेत घुसून निदर्शने केली होती. त्यावेळी निदर्शनी ‘वाघिणी’चे संस्थापक अध्यक्ष किशोर जगताप आमरण उपोषणाला बसले तेव्हा शिवसेनेच्या आणि महापालिकेच्या वतीने स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे व सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी भेट दिली होती. आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देवू असे आश्वासनही दिले होते. परंतू या अस्श्वासनाप्रमाणे रहिवाश्यांना न्याय देण्यात फणसे व विश्वासराव यान अपयश आल्याने पुन्हा आंदोलन करण्यात आले.
‘वाघिणी’च्या आरती बडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वयोवृद्ध सुलोचना शिगवण, निर्मला जरीवाला, आरती धुरी, मृणाल हुले, अक्षता दुधवडकर या स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्या कार्यालयात घुसल्या. तेव्हा फणसे यांनी उडावाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. तेव्हा या महिलांनी तिथेच त्यांना शिव्यांची लाखोली वाहीली. फणसे यांना त्यांच्या दालनात शिव्या घातल्या गेल्याने फणसे यांचे धाबे दणाणले आणि त्यांनी हा विषय माझ्याकडे नाही माझे हात दगडाखाली अडकले आहेत तुम्ही सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांची भेट घ्या असे सांगून शिवसेनेकडे असलेला हा विषय भाजपाच्या माथी मारला.
भाजपाचे सुधार समिती अध्यक्ष असलेल्या प्रकाश गंगाधरे यांच्याकडूनही काही तरी सकारात्मक उत्तरे मिळेल या अपेक्षेने गेलेल्या या महिलांना तिथेही तशीच वागणूक मिळाली. गंगाधरे यांनी ‘‘तुम्हाला बिल्डर कशाला बदलून हवा. तुम्हाला घरे मिळाल्याशी कारण. बिल्डर बदलण्याची मागणी का करता.’’ अश्या विविध प्रश्नांची सरबत्ती केल्याचे रहिवाश्यांनी सांगितले. दरम्यान आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत पालिकेतील सत्ताधारी शिवसेनावाल्यांनी आमचा संसार उधवस्त केला आहे . पावसाळा तोंडावर आला आहे. आम्हाला घरे मिळाली नाही तर पालिकेत घुसून आत्मदहन करून घेवू ’ अशी संतापात प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे.

