मुंबई (प्रतिनिधी) - वडाळा येथील नाना फडणवीस उड्डाणपुलावरील पदपथावरील अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर)पल्लवी दराडे यांनी दिले आहेत. तसेच जयकरवाडी लगतच्या डोंगर उतारावर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी कार्यवाही करावी व त्यासाठी समन्वय साधावा, अशा सुचनाही त्यांनी केल्या आहेत. पदपथावर झोपडीधारकांनी केलेले अतिक्रमण आणि जयकरवाडी बरकत अली दर्ग्याजवळील डोंगर उतारावर करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे यांची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. याप्रसंगी पालिका सभागृह नेता तृष्णा विश्वासराव एफ/उत्तर’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलकाससाणे आणि संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते.
नाना फडणवीस उड्डाणपुलावर झोपडीधारकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना पुलावरून पदपथावर चालताना गैरसोय होते. अनेकवेळा अपघात देखील होतात. त्यामुळे पुलावरील पदपथावर झालेले अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. तसेच डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत एक मजली, दुमजली अनधिकृत बांधकामे झाली आहेत. परिणामी, या ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळून अपघात होण्याचा कायम संभव आहे. त्यामुळे तात्काळ खबरदारीची पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच उड्डाण पुलावरील २६९ झोपड्यापैकी पात्रता निकषा आधारे पात्र झोपडीधारकांचे प्रकल्प बाधित प्रकल्पात स्थलांतर करावे. तर उर्वरित अपात्र झोपड्या निष्कासित कराव्यात, अशा सुचनाही दराडे यांनी दिल्या.

