एसीबी विशेष न्यायाधीशांशी समन्वय साधणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 June 2015

एसीबी विशेष न्यायाधीशांशी समन्वय साधणार


मुंबई : सरकारी यंत्रणेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड दूर करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) विविध पावले उचलली जात आहेत. राज्यात लाचखोरीचे अनेक खटले प्रलंबित असून या खटल्यांचा तातडीने निपटारा केला जावा, यासाठी एसीबी सध्या विशेष न्यायालयांच्या न्यायाधीशांशी समन्वय साधत आहेत. एसीबीचे अधिकारी तपास यंत्रणेचे कामकाज तसेच अन्य बाबींची माहिती विशेष न्यायाधीशांना देऊ लागले आहेत.
राज्य एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी याबाबत सांगितले की, आमच्या पथकांना विशेष न्यायालयांच्या न्यायाधीशांशी संवाद साधून आपल्या तपास यंत्रणेच्या कामकाजाची माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पुढील काही काळ सुरू ठेवणार आहोत. एसीबीच्या कामकाजाची चांगली माहिती असणार्‍या न्यायाधीशांचे प्रमाण कमी आहे; पण नव्या न्यायाधीशांना एसीबीचे कामकाज, गुन्ह्याची उकल करण्याची तंत्रे तसेच खटल्यांचे स्वरूप आदी माहिती पुरवणे गरजेचे असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले. न्यायाधीशांशी समन्वय साधल्यामुळे लाचखोरीचे खटले जलदगतीने निकाली निघतील, तसेच दोषत्वाचा दर सुधारण्यासही मोठी मदत होईल, असेही ते म्हणाले. माहिती अधिकारातून उघडकीस आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र एसीबीने २000 ते २0१४ या कालावधीत राज्य पोलीस दलातील १७६४ पोलीस अधिकारी व कॉन्स्टेबल्सविरुद्ध गुन्हा दाखल केला; पण केवळ १७७ आरोपींना दोषी ठरवले गेले, तर ५७३ आरोपी निर्दोष सुटले.

Post Bottom Ad

JPN NEWS