मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबईमधून गेल्या ३ वर्षात १२८९ तर सन २०१५ मध्ये एप्रिल पर्यंत ९७ अश्या एकूण १३८६ लोकांना तडीपार करण्यात आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेने आरटीआय कार्यकर्ते आनंद पारगावकर यांना माहिती अधिकारातून दिली आहे.
मुंबई आणि ठाण्यातून किती लोकांना सन २०१२ पासून तडीपार केले याची माहिती आनंद पारगावकर यांनी मागवली होती. याबाबत माहिती देताना सन २०१२ मध्ये ४२५, सन २०१३ मध्ये ४५४, सन २०१४ मध्ये ४१० तर सन २०१५ मध्ये ३० एप्रिल पर्यंत ९७ लोकांना मुंबईमधून तडीपार केले आहे. तडीपार केलेल्या लोकांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त असून त्याप्रमाणात महिलांचे प्रमाण फारच कमी असल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे. सन २०१३ मध्ये २ तर सन २०१४ मध्ये ३ तर सन २०१५ मध्ये १ अश्या एकूण ६ महिलांना अद्याप तडीपार करण्यात आल्याचे आकडेवारीतून कळविण्यात आले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या आकडेवारीवरून मुंबई मधून ४०० पेक्षा अधिक लोकांना तडीपार केले जात असल्याचे समजते.

