नालेसफाईबाबत शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नालेसफाईबाबत शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नाही

Share This
मुंबई : रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईबाबत मुंबई महापालिका आणि रेल्वे यंत्रणा यामध्ये समन्वय नाही. तसेच शहरात आणि रेल्वेच्या हद्दीतही सफाई समाधानकारक न झाल्यानेच तीन दिवसांपूर्वी मुंबईत व रेल्वेत पाणी तुंबले, असा आरोप भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार अँड़ आशीष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. नाल्यातील गाळ मोजणार्‍या वजनकाट्यातील घोटाळा, गाळ टाकण्यात येणारी क्षेपणभूमी आणि कंत्राटदारांचे 'रॅकेट' यामुळे शहरातील नालेसफाई चांगली झाली नाही आणि रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाई व्यवस्थित करण्यासाठी मुंबई महापालिका व रेल्वे यांच्यात एकात्मिक विकासाच्या संचलनाचे नियोजन नसल्यामुळे रेल्वे रुळात पाणी तुंबले, असेही ते म्हणाले. 

नालेसफाईमधील असलेल्या त्रुटी भाजपानेच मांडल्या. गाळ मोजण्यासाठी असलेला वजनकाटा आणि यातील कंत्राटदार हे विश्‍वास ठेवण्यासारखे नसून गाळ मोजल्यानंतर कंत्राटदारांकडून देण्यात येणार्‍या पावत्यांची विश्‍वासार्हता तपासण्यासाठी यंत्रणाच अस्तित्वात नाही, यामुळे शहरातील नालेसफाई योग्य झाली नाही, असे शेलार म्हणाले. नालेसफाई करताना रेल्वे आणि पालिका यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे पण तो नसल्यानेच यंदाही रेल्वे रुळात पाणी तुंबले, असा आरोप शेलार यांनी केला. यासंबंधी आणि रेल्वेशी संबंधीत अन्य मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी २७ जून रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, पालिका आयुक्त, सरकारमधील अधिकारी यांची उच्चस्तरीय बैठक होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages