अन्यथा आरपीआयचे कार्यकर्ते गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करतील - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अन्यथा आरपीआयचे कार्यकर्ते गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करतील

Share This

मुंबई : हातभट्टी दारूचे अड्डे मृत्यूचे सापळे ठरत आहेत. कायद्याने जरी हातभट्टी दारूला बंदी असली, तरी राज्यात अनेक ठिकाणी हातभट्टी दारू विकली जात आहे. अशा अड्डय़ांचा पोलिसांनी शोध घेऊन ते बंद करावेत, अन्यथा हे दारूचे अड्डे रिपब्लिकन कार्यकर्ते उद्ध्वस्त करतील, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी चेंबूर येथे शनिवारी दिला. 
मालाड, मालवणी येथील अवैध गावठी दारुकांडात शंभरहून अधिक लोकांचा बळी गेला. या घटनेचा निषेध करण्यासाठी खासदार रामदास आठवले यांची शनिवारी चेंबूर येथे सभा झाली. या वेळी ते बोलत होते. या वेळी खा. आठवले यांच्या नेतृत्त्वात वसंत पार्क, चेंबूर पोलीस ठाणे येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अविनाश महातेकर, तानसेन ननावरे, सिद्धार्थ कासारे, फुलाबाई सोनावणे आदींसह या भागातील रिपाइंचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

दरम्यान, अवैध गावठी दारू कायमची बंद करण्यात यावी, यासाठी मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या स्थानिक पोलीस ठाण्यावर मोर्चे काढण्याचे आवाहन या वेळी केले होते. त्या अनुषंगाने शनिवारी अंधेरी व पार्ल्यातील विविध पोलीस ठाण्यावर रिपाइं कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चा काढून विभागात सुरू असलेली अवैध गावठी दारुबंदी करावी, या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर निदर्शने केली. अंधेरीतील एमआयडीसी, सहार व पार्ल्यातील विलेपार्ले व विमानतळ पोलीस ठाण्यासमोर आरपीआयच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढला.

उत्तर पश्‍चिम जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव व मुंबई सचिव प्रकाश खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षण राजाराम मांडगे यांना निवेदन देण्यात आले. युवा जिल्हाध्यक्ष भरत पाईकराव हे आपल्या असंख्य युवक कार्यकर्त्यांसह मोर्चात सहभागी झाले होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages