लाचखोरांविरोधात ६ महिन्यांत ६४0 गुन्हे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लाचखोरांविरोधात ६ महिन्यांत ६४0 गुन्हे

Share This
दोषसिद्धीचे प्रमाण ६५ टक्क्यांनी वाढले

मुंबई / प्रतिनिधी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १ जानेवारी ते ३0 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात ६१२ कारवाया करून एकूण ६४0 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ४६ कारवाया अधिक असल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दोषसिद्धीचे प्रमाण ६५ टक्क्यांनी वाढली आहे. 


एसीबीने यंदा लाचखोरांविरोधात विशेष मोहीम राबवली. हेल्पलाइन व मोबाइल अँप्सद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध केल्याने तक्रारदारांना सहजरीत्या लाचखोरीच्या प्रकरणांची माहिती एसीबीला देता आली. त्यामुळे लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात मोठे यश एसीबीला आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ६ महिन्यांच्या कारवाईत १ कोटी, ४२ लाख २७,४६३ रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. त्याचबरोबर अपसंपदाप्रकरणी एकूण मालमत्ता ९ कोटी ७६ लाख ५१,३९५ एवढी आहे.

यंदाचा एसीबीने केलेल्या कारवायांमध्ये प्रामुख्याने महसूल विभाग आघाडीवर असून या विभागाचे १९१ जण एसीबीच्या सापळय़ात अडकले. त्यानंतर पोलिसांचा क्रमांक लागत असून १७७ लाचखोर पोलिसांना पकडण्यात एसीबीला यश आले. त्याखालोखाल ग्रामविकास विभाग (१११), नगर विकास (४२), म.रा.वि.वि.क. र्मयादित (३५), आरोग्य विभाग (२३), शिक्षण विभाग (३0), वन विभाग (२२), सहकार व पणन विभाग (११), पाटबंधारे विभाग (७) अशा लोकसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवायांत प्रामुख्याने १५५ पोलीस, ८२ तलाठी, ३0 इंजिनीयर, २२ शिक्षक, ११ डॉक्टर, ४ वकील, २ नगरसेवक/महापौर, ३ सभापती/ नगराध्यक्ष, त्याचप्रमाणे ५0 महिला लोकसेवकांवर कारवाई करण्यात आली.

या चालू वर्षात वृद्ध, महिला, अपंग, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती या वर्गातील एकूण ९२ तक्रारदारांकडून आलेल्या तक्रारीवरून ११0 लोकसेवकांवर कारवाया करण्यात आल्या. जून २0१४ पर्यंत ३७ गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धी झाली होती. त्याच्या तुलनेत या वर्षी ६१ गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धी झाली असून ही आकडेवारी गेल्या वर्षापेक्षा ६५ टक्क्यांनी वाढली आहे. एसीबीची राज्यभरात एकूण ३५८७ प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages