मुंबई – देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने मुंबईत येणा-यांची संख्या वाढतच चालली आहे. मात्र त्याचबरोबर मुंबईतून बेपत्ता होणा-यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मुंबईतून दर महिन्याला तब्बल ८८४ जण बेपत्ता होत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण अधिक आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील १०.५ वर्षात तब्बल मुंबईतून एक लाख १० हजार ५४७ जण बेपत्ता झाले. त्यापैकी एक लाख चारशे ३९ जणांचा शोध घेण्यात यश मिळाले तर १० हजार १०८ जण अद्यापही बेपत्ता आहेत. जानेवारी २००५ ते मे २०१५ या कालावधी दरम्यान बेपत्ता झालेल्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत अल्पवयीन मुलींचे प्रमाण अधिक आहे. पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दहा वर्षात १८ हजार ५४७ मुली, ३७ हजार ६०३ स्त्रिया आणि १७ हजार १९५ मुले आणि ३७ हजार २०२ पुरुष बेपत्ता झाले.
दरम्यान, बेपत्ता झालेल्यांपैकी ९० टक्के लोकांचा शोध घेतल्याचा दावा पोलीस करत आहेत. तर मे अखेरपर्यंत ५८२ अल्पवयीन मुली आणि दोन हजार ९४४ स्त्रिया अद्याप बेपत्ता आहेत. आम्ही आतापर्यंत ९० टक्के बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात यशस्वी ठरलो आहोत. यासाठी एक पथक नेमण्यात आले आहे जे २४ तास या प्रकरणांशी संबंधित काम करते असे मुंबई पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. गेल्या सात महिन्यात बेपत्ता मुलांच्या शोध मोहिमेत मुंबई पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे. नोव्हेंबर २०१४ ते मे २०१४ या वर्षभरात एक हजार ३३ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या. त्यापैकी एक हजार ३९ मुलांचा(यापूर्वी काही बेपत्ता झालेल्या मुलांचाही) शोध घेण्यात यश आले.

