पालिकेचा प्रदूषण विभाग कार्यरतच नाही
मुंबई / प्रतिनिधी ( 6/7/2015)
मुंबईकर जनतेच्या जीवनाशी निगडीत असलेल्या पर्यावरण विभागाकडे मुंबई महानगर पालिकेचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. प्रदूषण विभागाची खर येथील वायू वैविध्य सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळा ज्या इमारतीत आहे ती इमारत मोडकळीस आली आहे. पालिकेच्या प्रदूषण विभागाची प्रयोगशाळा जेथे स्थलांतरित केली जाणार आहे त्या जागेमध्ये एकही संगणक नसल्याने निष्कर्ष अचूक येण्यास अडचण निर्माण होणार आहे. वरळी येथील प्रयोगशाळा कर्मचारी नसल्याने बंद पडली आहे. परिणामी औद्योगिक प्रदूषण तसेच ध्वनी प्रदुषणाची नोंद होत नसल्याने मुंबईकर जनतेचे आरोग्य धोक्यात असताना मुंबईला स्मार्ट सिटी कशी केली जाईल असा मुद्दा शिवसेनेच्या नगरसेविका व माजी महापौर शुभा राऊळ यांनी पालिका सभागृहात ६६ ब नुसार उपस्थित केला.
मुंबई मध्ये सातत्याने वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण वाढत असताना हवेतील शिशाचे प्रमाण मोजणी करण्यासाठी असलेले यंत्र जागे अभावी पडून आहे. पालिकेने ग्यास क्रोमोटोग्राफ यंत्र विकत घेवून एक वर्षाहून अधिक काळ झाला असून जागे अभावी या यंत्राचा वापर होऊ शकलेला नाही. पर्यावरण विभागात कर्मचारी नसल्याने शांतता प्रवण क्षेत्र, छोट्या कंपन्या, व मोठे उद्योग धंदे यांचे वर्गीकरण करण्याची कामे रखडली आहेत. पर्यावरण विभाग असला तरी या विभागाकडून कामे होत नसल्याने मुंबई शहराची पर्यावरण स्थिती सुधारण्यावर परिणाम होणार असल्याचे राऊळ यांनी सांगितले. याबाबत बोलताना शीतल म्हात्रे यांनी मुंबईला स्मार्त सिटी बनवायची असेल तर त्यासाठी पर्यावरण चांगले राकाहणे गरजेचे असल्याने पालिकेने पर्यावरण समिती बनवण्याची मागणी केली. डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी सन २०११-१२ मध्ये राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेने मुंबई मध्ये प्रदूषण वाढत असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या आहवाला नुसार मुंबई मध्ये १० टक्क्याहून अधिक लोकांना अस्थम्याचा त्रास झाला आहे. अश्या वेळी राज्य केंद्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने एकत्र येवून राष्ट्रीय प्रदूषण केंद्र सुरु करण्याची मागणी केली.
समाजवादी पक्षाचे याकुब मेनन यांनी भारताच्या प्रधानमंत्र्यांना जगाच्या आरोग्याची चिंता आहे. त्यासाठी त्यांनी योगा डे साजरा केला. परंतू याच प्रधानमंत्र्यांच्या देशात मुंबई सारख्या जागतिक दर्जाच्या शहरामध्ये प्रदूषणाची अवस्था दयनीय असल्याने हे हि परिस्थिती महापौरांनी प्रधानमंत्र्यांना पत्राद्वारे कळवावी आणि केंद्र व राज्य सरकारच्या प्रदूषण विभागाला कामाला लावून मुंबईकर जनतेला प्रदूषणा पासून वाचवण्यास सांगावे अशी मागणी केली. तर मनसेचे प्रकाश दरेकर यांनी पालिकेमध्ये सत्तेत असलेल्यांनाच प्रशासना विरोधात ६६ ब द्वारे चर्चा करावी लागते हि शोकांतिका आहे. पालिकेच्या प्रदूषण विभागाचे अधिकारी "एम" विटामीन घेत असल्याने अधिकाऱ्यांचे चांगले होत असताना मुंबईकर जनतेचे आरोग्य मात्र धोक्यात आले असल्याचे म्हटले आहे

