काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये व इतरत्र मुसळधार पाऊस पडल्यामुळे सर्वत्र पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱया रेल्वेच्या विविध स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे रेल्वेची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेस नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले होते. यासंबंधीचा अहवाल मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी रेल्वे प्रशासनाकडून मागविला आहे.
रेल्वे हद्दीतील नालेसफाई करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेकडून प्रतिवर्षी नियमितपणे निधी उपलब्ध करुन दिला जातो. परंतु, रेल्वे हद्दीतील नाल्यांची सफाई रेल्वे प्रशासनाकडून न झाल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा योग्यरित्या झाला नाही. परिणामी, रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून मध्य रेल्वेच्या गाड्या ठिकठिकाणी बंद पडल्या होत्या. महापालिकेच्या वतीने रेल्वे हद्दीतील नालेसफाई करण्याकरीता देण्यात आलेल्या निधीचा विनियोग कशाप्रकारे झाला, याची तपशीलवार माहिती लवकरात-लवकर महापौर स्नेहल आंबेकर यांनी सादर करण्यास पश्चिम व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्राद्वारे कळविले

