मंगळवारी दिवसभरात मुंबई व उपनगरीय रेल्वे मार्गावर वेगवेगळय़ा अपघातात एकूण १५ जण लोकलखाली सापडून ठार झाले असून ११ जण जबर जखमी झाले आहेत. मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली रेल्वेसेवा आता मृत्यूचा सापळा ठरू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.
मागील वर्षभरात लोकल अपघातात एकूण १ हजार ९६४ जणांचा मृत्यू झाला असून यात १ हजार ५८२ पुरुष तर ३७७ महिला व इतर २ प्रवाशांचा सामावेश आहे. कल्याण विभागात सर्वाधिक ३०५ जणांचा तर ठाणे विभागात २१५ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी एकाच दिवशी झालेल्या रेल्वे अपघातांत ठाणे ३, दादर १, कुर्ला २, कल्याण ३, कर्जत १, वडाळा १, चर्चगेट १, मुंबई सेंट्रल १, तर वसई रोड स्थानकांत दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
