मुंबई,शुक्रवार ( प्रतिनिधी ) पालिका शाळांच्या-शौचालयांची दुरावस्था, इमारतींची पडझड, स्वच्छतेचा अभाव,बालवाड्यांध्ये चालणारा गैरव्यवहार, शिक्षकांना कारकूनी करावी लागत असल्याने शिक्षणावर होणारा परिणाम, असा पालिकेच्या शिक्षणाच्या दुर्दशेचा पाढाच आज नगरसेवकांनी पालिका सभागृहात वाचला.आणि पालिकेला चांगले धारेवर धरले तर सत्ताधारी शिवसेना भाजपच्या काळात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याची टीका विरोधी पक्षानी करीत तोंडसुख घेतले.
अंधेरी येथील गिल्बर्ट पालिका शाळेत विद्यार्थी आहेत तर शिक्षक नाहीत अशी स्थिती आहे. पालिकेच्या शाळांना दिलेले संगणक नादुरूस्त आहेत. शाळांचे मुख्याध्यापक एक दोन संगणक दुरूस्त करून चालवित आहेत. संगणक भंगारात काढण्यालायक झाले आहेत ही स्थिती कॉंग्रेसचे मोहसिन हैदर यांनी मांडली. कॉंग्रेसच्या शितल म्हात्रे यांनी शाळांच्या स्वच्छता आणि सुरक्षेचे धिंडवडे निघाल्या असल्याचे मत मांडले. खासगी संस्थेला काम देवूनही कामे योग्य होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पालिकेच्या शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच वरळीतील शाळांमधील वीजेचे मीटर कापलेंहोते. त्यामुळे पहिले काही दिवस विद्यार्थ्यांना अंधारात काढावे लागल्याची गंभीर बाब राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रत्ना महाले यांनी मांडली. बिलाच्या दंडाची रक्कम न भरल्यामुळे ही कारवाई बेस्टने केली. शिवसेना आणि भाजप युतीच्या काळात पालिकेच्या शाळांतील शिक्षणाची अशी दुर्दशा चालू असल्याबद्दल सपाचे नगरसेवक याकूब मेमन यांनी टीका केली. शाळांमधील असुविधा तसेच शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी कारवाई करावी तसेच, विद्यार्थ्याना पुरविल्या जाणाऱ्या 27 शैक्षणिव वस्तू वेळेत पुरवा असे आदेश महापौर स्नेहल आंबेकर, यानी दिले
