पुरोगामी म्हवणाऱ्या सामाजिक, राजकीय संघटनांचे दुर्लक्ष
मुंबई / अजेयकुमार जाधव / 17 September 2015
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या पारदर्शक नियुक्ती आणि अध्यक्ष पदावरुन गजेंद्र चौहान यांना हटविण्याच्या मागणीसाठी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात १० सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. व्यवस्थे विरोधात सुरु असलेल्या या उपोषणाकडे गेले ८ दिवस मुंबई मधील मिडिया आणि पुरोगामी म्हवणाऱ्या सामाजिक राजकीय संघटनांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या निवडीमध्ये पारदर्शकता आनण्याच्या आणि अध्यक्ष पदावरुन गजेंद्र चौहान यांना हटविण्याच्या मागणीसाठी आणि संस्थेतील विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला तीन महिने उलटूनही सरकारने याची दखल घेतलेली नाही. १९ सप्टेंबरला आंदोलनाचा १०० वा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर हे विद्यार्थी पुन्हा एकदा दिल्लीत आणि पुण्याला प्रोटेस्ट मार्च काढणार आहेत. १९ सप्टेंबरच्या मार्च मध्ये विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. बुधवारी मुंबईच्या आझाद मैदानात विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी संभाजी भगत यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ देशभरात ठिकठिकाणी लाक्षणिक उपोषण, निदर्शने केली जात असताना, पून्हा एकदा सरकारचे दरवाजे ठोठावण्यासाठी आंदोलनाच्या १०० व्या दिवशी दिल्लीत मंडी हाऊस ते जंतरमंतर दरम्यान हा प्रोटेस्ट मार्च काढण्यात येणार आहे. यामध्ये दिल्लीतील विविध कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याचाच एक भाग म्हणून दिल्ली येथेच १६ सप्टेंबरला आंबेडकर युनिव्हर्सिटी येथे दुपारी वाजता लघुपटाचे सादरीकरण आणि चर्चा करण्यात आली. १७ सप्टेंबरला जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी येथे संध्याकाळी कल्चरल प्रोटेस्ट काढण्यात आला. तर १८ सप्टेंबरला नॉर्थ कॅम्पस येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली बरोबर मुंबईतही याच दिवशी समर्थनार्थ प्रोटेस्ट मार्च काढण्यात येणार आहे. दरम्यान, यापूर्वीही दिल्लीत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात याच मागणीसाठी प्रोटेस्ट मार्च काढण्यात आले होते.
पुरोगामी म्हणणाऱ्यांचे दुर्लक्ष
मुंबईमध्ये १० सप्टेंबर पासून गेले ८ दिवस व्यवस्थे विरोधात विद्यार्थ्यांचे उपोषण सुरु असताना एकाही पुरोगामी म्हणणाऱ्या संघटनेने किंवा राजकीय पुढाऱ्याने, पक्षाने या आंदोलनाला भेट दिलेली नाही. व्यवस्थेकडून एफटीआयआयच्या निया मक मंडळाच्या पदावर विशिष्ठ संस्थेशी संबंधित लोकांना लादले जात आहे. नियामक मंडळावर चांगल्या लोकांची नियुक्ती करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांची लढाई सुरु आहे. विद्यार्थ्यांची आणि पुरोगामी संघटनांची लढाई एकच असताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे मात्र पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्षांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
