मुंबई / प्रतिनिधी - दिनांक २६ ऑगस्ट, २०१५ च्या मध्यरात्रीपासून महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आल्यामुळे सर्व सेवा जलाशयांमध्ये दैनंदिन स्वरुपात जेवढे पाणी पुरविण्यात येत होते, त्यात १५ टक्के कपात लागू करण्यात आली आहे. याबाबत जल अभियंता खात्याने संनियंत्रण (Monitoring) करावयाचे असून त्याबाबतचा अहवाल नियमितपणे सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले.
सेवा जलाशयांना पुरविण्यात येणाऱया पाण्याच्या प्रमाणात लागू असलेली १५ टक्के पाणीपुरवठा कपात ही निश्चित स्वरुपाची आहे. तर पाणीपुरवठ्याच्या कालावधीमध्ये /वेळेमध्ये (Supply Timing) २० टक्के कालावधी कपात लागू आहे. परंतु, तांत्रिक आवश्यकतेनुसार कालावधीमध्ये / वेळेमध्ये बदल करण्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे. उदा. उंचावरील परिसर किंवा सखल परिसर, अशा परिसरांना होणाऱया पाणीपुरवठ्यामध्ये निर्माण होणाऱया तांत्रिक समस्यांमुळे नागरिकांना पाणी मिळण्यास अडचणी येऊ शकतात, हे लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये विभागीय स्तरावर बदल करता येऊ शकतो.
महापालिकेच्या सर्व २४ विभागांचे सहाय्यक आयुक्त हे त्यांच्या विभागातील सहाय्यक अभियंता (जलकामे) यांच्याशी समन्वय साधून त्यांच्या विभागातील ज्या परिसरांमध्ये अत्यंत कमी पाणीपुरवठा होत असेल ती ठिकाणे निश्चित करतील; तसेच आवश्यकतेनुसार सदर ठिकाणास यथोचित पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा कालावधीमध्ये / वेळेमध्ये आवश्यक तो बदल करु शकतील.
उंचावरील भाग व सखल भाग यांना आवश्यकतेनुसार वेगळ्या स्वरुपातील पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे तातडीने कृति आराखडा(Action Plan) तयार करावा, असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांनी दिले आहेत.
दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्यांबाबत जल अभियंता खात्याने युद्धस्तरावर कार्यवाही करावी आणि आवश्यक ती उपाययोजना तात्काळ अंमलात आणावी, असेही निर्देश आयुक्त महोदयांनी दिले आहेत.
महापालिकेच्या सर्व विभागातील सहाय्यक अभियंता (जलकामे) यांना त्यांच्या विभागातील पाणीपुरवठा विषयक समस्यांचे निवारण करण्यासाठी अधिक वेळ देता यावा, यासाठी त्यांना विविध बैठकांना / पाहणी दौऱयांना बोलाविण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित विभागातील सहाय्यक आयुक्तांनी सहाय्यक अभियंता (जलकामे) यांना निश्चित दिवशी व वेळ ठरवून बैठकीस बोलवावे, असेही निर्देश सुयोग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने देण्यात आले आहेत.
ज्या वसाहती (सोसायटी) / आस्थापना यांना नियमांनुसार मलनिःसारण प्रक्रिया संयंत्र(Sewerage Treatment Plant) उभारणे व त्याद्वारे प्रक्रिया केलेला पाण्याचा पुनर्वापर पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कामांसाठी करणे बंधनकारक आहे; मात्र, असे असुनही जेथे अशाप्रकारे पुनर्वापर करण्यात येत नसेल; तर अशा वसाहती / आस्थापना यांना संबंधित सहाय्यक आयुक्तांनी यथोचित प्रकारे नोटीस द्यावी, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
सर्व परिमंडळीय उप आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या संबंधित विभागातील खासगी व सार्वजनिक जागांवरील कूपनलिका (बोअरवेल / ट्युबवेल), विहिरी यासारख्या पाणीसाठ्यांची यादी तातडीने तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या यादीमध्ये संबंधित पाणीसाठ्याच्या ठिकाणांचे पत्ते, मालकीबाबतचा तपशिल व पाणी गोडे आहे अथवा खारे, इत्यादी माहितीचा तपशिल असणे आवश्यक आहे.
