मुंबई दि. 25
ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी आता भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून बोलू नये नैतिक दृष्ट्या त्यांना या विषयांवर बोलण्याचा अधिकार नाही. चालती गाडी पकडण्यासाठी उड्या मारण्याची कसरत त्यांनी बंद करावी. नालेसफाईच्या कामात दोषी ठरलेल्या व्यक्ती आणि कंत्राटदारांना वाचवण्यासाठी लक्ष वळवण्याचे काम संजय निरूपम यांनी करू नये, अशा शब्दात मुंबई भाजपा सरचिटणीस आमदार योगेश सागर यांनी संजय निरूपम यांना फटकारले आहे.
नालेसफाईच्या कामांचा चौकशी अहवाल आला आणि त्यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाईची प्रक्रीया सुरू झाल्यानंतर आता एक एक जण बोलून दोषी व्यक्तींना आणि कंत्राटदारांना वाचवण्याची धडपड करत आहेत. संजय निरूपम यांनी केलेले हे वक्तव्य त्यासाठीच असून त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आमचे लक्ष विचलीत होणार नाही.
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी सर्वात प्रथम मुंबईच्या आमदार आणि नगरसेवकांसह मुंबईच्या नालेसफाईच्या कामाची पाहणी केली त्यानंतर त्यामध्ये अनियमितता दिसून आल्यामुळे पालिका आयुक्तांना भेटून सर्वात प्रथम चौकशीची मागणी केली. विधानसभेतही या विषयावर चर्चा झाली. आणि त्यानंतरच चौकशीतून ढळढळीत सत्य समोर आले आहे. चौकशीत दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा अशीही मागणी सर्वात आधी भाजपाने केली. त्यावेळी तोंड गप्प ठेवून बसलेले संजय निरूपम आताच का बोलत आहेत.
भाजपाची बांधिलकी मुंबईकरांशी आहे. त्यामुळे आम्ही स्वच्छ आणि पारदर्शी कारभारासाठी मुंबईकरांच्या प्रश्नावर असे काम करीतच राहणार आहोत. ज्यांनी गेल्या 15 वर्षांत काय केले हे जनतेला माहित आहे. अशा अधिकार गमावलेल्या नेत्यांनी आणि पक्षांनी आता आम्ही काय करावे याचे सल्ले देणे बंद करावे. आम्हाला त्यांच्या सल्ल्यांची गरज नाही. चौकशीमध्ये दोषी ठरलेल्या कंत्राटदरांवर एफआयआर नोंदवले गेले आणि आता पुढे पोलीस चौकशी होऊन गुन्हे दाखल होतील म्हणूनच की काय संजय निरूपम यांच्यासारखे नेते या कंत्राटदारांच्या बचावासाठी भाजपावर आरोप करत सुटले आहेत. पण त्यांचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आमची बांधिलकी मुंबईकरांशी आहे. भ्रष्टाचार उघड करून दोषींवर कारवाई होईपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करूच अशा शब्दात आमदार योगेश सागर यांनी निरूपम यांचा समाचार घेतला आहे.

