मुंबई \१३ ऑक्टोबर २०१५\ रशिद इनामदार
भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईत पुन्हा एकदा घातपात होण्याची शक्यता दिसू लागली आहे. एका रिक्षा चालकाच्या जागरूकतेमुळे ही धक्कादायक बाब मुंबई पोलिसांना कळली आहे. त्याने दिलेल्या माहितीमुळे मुंबई, नवी मुंबई परिसरामध्ये तीन प्रशिक्षित दहशतवादी फिरत असल्याचे समोर आले आहे. रिक्षा चालकाकडून मिळालेल्या माहिती नुसार मुंबई पोलिस शोध घेत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
रिक्षाचालकाने दिलेल्या माहितनुसार दिनांक १० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास तीन जण त्याच्या रिक्षामध्ये बसले. शीव येथील उड्डाणपुला जवळून ते तिघे रिक्षामध्ये बसले . त्यांनी मुलुंड चेकनाका इथे सोडण्यास सांगितले. विक्रोळीच्या पुढे आल्यावर मात्र त्यांचा बेत बदलला. त्या तिघांपैकी एकाने मुलुंड चेकनाक्या ऐवजी ऐरोली चेकनाक्याजवळ सोडण्यास सांगितले. त्या तिघांजवळ ३ जड ब्यागा होत्या आणि एक खड्याला अडकवायची ब्याग पण होती. त्या तिघांपैकी दोघेजण मलेशियाच्या मलयू भाषेत बोलत होते. तिसऱ्याला ती येत नव्हती मात्र त्याला ती कळत होती. रिक्षाचालक सुद्धा ४ वर्षे मलेशियात नोकरीसाठी राहिलेला असल्याने त्याला त्या तिघांचे बोलणे समजत होते. त्यांच्या बोलण्याची पद्धत हि पाकिस्तानातील पंजाब भागातील लोकांसारखी होती. हे त्या रिक्षाचालकाने अचूक ओळखले कारण तो मलेशिया मध्ये नोकरी करत असताना त्याच्यासोबत बरेचा पाकिस्तानी नागरिक देखील नोकरीस होते. त्यापैकी एकजण म्हणाला ," ये काम हो गया तो फ्यामिली का क्या होगा ?" दुसऱ्याने उत्तर दिले ," कुछ नही होगा , आका सब संभाल लेगा ." पुढे तो म्हणाला " कसाब के फ्यामिली का चंगा है " हे संभाषण रिक्षाचालकाने ऐकलं व पोलिसांना सविस्तर माहिती दिली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यापैकी दोघांची रेखाचित्र बनवली आहेत.पोलिस त्यांचा मुंबई , नवी मुंबई परिसरामध्ये कसून शोध घेत आहे. ऐन सणांच्या काळात घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.पोलिस अधिकारी सी सी टी व्ही फुटेज च्या आधारे त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
