जळगाव - ‘गद्दार व्ही. पी. सिंग यांनी हिंदू धर्मीयांमध्ये फूट पाडली तर ब्रिटनच्या लोकांनी भारतात साई मंदिर उभे केले. शिर्डी येथे साईबाबाच्या नावाने व्यवसाय चालला आहे. सनातन धर्मात शिव, शक्ती, विष्णू, गणेश, सूर्य आणि नवदूर्गा पूजल्या जातात. या सर्वांना सोडून साईबाबा या मनुष्याची पूजा करणे समजदारपणा नाही. सन १८३८ मध्ये साईबाबांचा जन्म तर १९१८ मध्ये मृत्यू झाला. त्याच्या अंधविश्वासू चमत्कारांवर विश्वास ठेवून तुम्ही त्यांना मनात स्थान देत असाल तर राम मंदिराऐवजी शिर्डीत धर्मस्थान उभे राहील. साईबाबा यांनी कधी श्रीराम, कृष्णांची नावे घेतली आहेत काय? त्यांच्या मुखात नेहमी अल्लाहचे नाव होते. त्यामुळे साई धर्म मिटवा आणि सनातन धर्म वाढवा’, असा नारा शंकराचार्यांनी दिला. साईबाबांची डीएनए टेस्ट करा, अशी मागणी करून नवा वाद शंकराचार्यांनी उभा केला.
‘वेद,शास्त्र मानणारा खरा हिंदू असताे, ते मानत नसाल तर हिंदू नावाला अर्थ उरत नाही. भविष्यात हिंदू धर्म राहिला तरच भारतात एकता राहील. अापल्या देशात सर्व हिंदू एकोप्याने नांदत असताना गद्दार व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयाेग आणून त्यांच्यात फूट पाडली अन् दलित आणि सवर्ण असे भेद निर्माण केलेत’, असा अाराेप द्वारका ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी रविवारी केला. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे नेतृत्व करायचे असेल तर त्यांनी देश संस्कृती समजून घ्यावी. तुम्ही केवळ पाच वर्षांसाठी आहात. आम्ही कायमस्वरूपी आहोत. काही शंका असल्यास त्यांनी विचारावी’, असे विधानही शंकराचार्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केले. ‘अापण फडणवीस यांचा ‘धर्मभ्रष्ट’ म्हणून उल्लेख केल्याचे एक विधान प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाले आहे. मात्र तसे विधान केलेच नव्हते, तर त्याचा विपर्यास करण्यात आला हाेता, ही चुकीची गाेष्ट अाहे. आम्ही त्यांना ज्ञान देतो, धिक्कारत नाही’, असे स्पष्टीकरणही शंकराचार्य यांनी दिले.
