स्मारकाचे उद्या भूमिपूजन : आंबेडकर कुटुंबीयांना नुसतेच फोन; निमंत्रण नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्मारकाचे उद्या भूमिपूजन : आंबेडकर कुटुंबीयांना नुसतेच फोन; निमंत्रण नाही

Share This
मुंबई 10 Oct 2015 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी हाेत असलेल्या इंदू मिल स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाचे निमंत्रण अद्याप आंबेडकर कुटुंबीय, माजी मुख्यमंत्री अाणि नेतेमंडळी अशा कुणालाही पोहोचलेले नाही. इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री वा ज्येष्ठ मंत्र्यांकडून आंबेडकर कुटुंबीयांना निमंत्रणे अपेक्षित असताना पोलिसांकडून केवळ निमंत्रणाचे दूरध्वनी करण्याचे संतापजनक प्रकार सुरू अाहेत. एवढेच नव्हे, कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी असणाऱ्या ‘एमएमआरडीए’ कडून सर्व माहिती गुप्त ठेवण्यात अाल्याने या साेहळ्याची नियाेजनशून्यता समाेर अाली अाहे.

या स्मारकाची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आहे. कार्यक्रमाचे निमंत्रण एमएमआरडीए देणार आहे. मात्र शुक्रवारी रात्रीपर्यंत आंबेडकर कुटुंबीयांपैकी कुणालाही निमंत्रण मिळाले नव्हते. मात्र कार्यक्रमाचे पास बनवत असल्याचा पोलिसांनी दूरध्वनी केला होता, अशी माहिती बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी दिली.

रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर स्मारकाच्या आराखड्यावरून नाराज आहेत. त्यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचे जाहीर केले होते. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी आनंदराज यांना तातडीने निमंत्रणाचे पत्र पाठवले आहे. अाता आपण बहिष्कार मागे घेतला असून कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे आनंदराज म्हणाले.

आंबेडकर कुटुंबीयांपैकी बाबासाहेबांच्या सून तसेच बौद्ध महासभेच्या अध्यक्षा मीराताई आंबेडकर आणि त्यांचे पुत्र अॅड. प्रकाश, भीमराव, आनंदराज हे तिघे बाबासाहेबांचे नातू कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रिपाइं नेते आणि खासदार रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व भाजपचे आंबेडकरी नेते आमदार भाई गिरकर आदी नेतेमंडळी इंदू मिलमधील भूमिपूजन कार्यक्रमाला हजर असणार आहेत.

बुद्धवंदना होणार 
भूमिपूजनाचा कार्यक्रम बौद्ध पद्धतीने व्हावा असा आमचा आग्रह होता. िवधीबाबत वाद नको, कुदळ मारून पुढे जाऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. परंतु आंबेडकरी नेत्यांच्या आग्रहामुळे भूमिपूजन बौद्ध पद्धतीने करण्याचे ठरल्याचे भंते राहुल बोधी यांनी सांगितले.

ज्येष्ठांना डावलणे अयाेग्य : मुंडे 
मला व राधाकृष्ण विखे पाटील यांना विराेधी पक्षनेते म्हणून निमंत्रणे आली आहेत. मात्र आमचे नेते शरद पवार व अजित पवार यांना िनमंत्रण आले नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. ‘राजशिष्टाचाराप्रमाणे मला निमंत्रण पाठवले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार या दोघांनाही निमंत्रण आलेले नाही. ज्येष्ठ नेत्यांना इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचे निमंत्रण नसावे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यात याआधी असे कधी घडले नव्हते,' अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी व्यक्त केली.

अशाेक चव्हाणही प्रतीक्षेतच
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, ‘स्मारक भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे िनमंत्रण अद्याप तरी आपल्याला आलेले नाही’, असे सांगितले.



दैनिक दिव्य मराठीमधून साभार 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages