मुंबई- देशातील असहिष्णु वातावरणाविरोधात आवाज बुलंद करणा-या मराठी साहित्यिक प्रज्ञा पवार यांनी आपले सर्व सरकारी पुरस्कार रक्कमेसह शासनाला परत केले आहेत. सुधींद्र कुलकर्णी याच्यासाेबत घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून त्यांनी आपले सरकारी पुरस्कार रक्कमेसह शासनाला परत केले आहेत.
भारतीय राज्यघटनेच्या पायाभूत मुल्यांवरच घाव घालण्याचा जो राजकीय वर्तुळात प्रयत्न सुरु आहे त्याचा आपण निषेध करत असल्याचे पत्रही प्रज्ञा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. देशातील बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीचा विरोध म्हणून हिंदीसह अन्य भाषांतील अनेक साहित्यिकांनी आपले पुरस्कार आणि पदांचा त्याग केला आहे. मात्र मराठीतील साहित्यिक अद्याप शांत होते. त्यामुळे प्रज्ञा पवारांच्या रुपाने निषेधाला सुरूवात झाल्याचे दिसत आहे. यानंतर आणखी तीन साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करत सरकारचा निषेध केला आहे. गणेश विसपुते, संजय भास्कर जोशी आणि हरिश्चंद्र थोरात यांनी आपले पुरस्कार परत केले आहेत.
