मुंबई 6 Oct 2015 ( प्रतिनिधी ) - मुंबईतील परिस्थिती पाहता मळनि:सारण वाहिनींचा प्रश्न बिकट होऊ शकत असल्याने केंद्र शासनाची शौचालय बांधणी योजना मुंबईत कशी राबविणार असा सवाल करीत स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी भाजपावर निशाना साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाकडून संपूर्ण देशात टोयलेट योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत सदर योजना राबविण्याचा विचार केल्यास मळनि:सारण वाहिन्यांमुळे यावर बंधने येऊ शकतात. त्याबरोबर शौचालय बांधल्यानंतरची व्यवस्था पालिकेला करावी लागणार असल्याने सदर योजना मुंबईत राबविणे शक्य नसल्याचे फणसे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबईतील गार्डनमध्ये टोयलेट उभारण्याबाबत पालिका प्रशासनाने ज्या नोटीसा लावल्या त्यामध्ये नगरसेवकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र सदर योजनेची कोणालाच माहिती नसल्याची नाराजी फणसे यांनी व्यक्त केली. नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांनी मते विचारात घेऊन गार्डन मध्ये 'पे अंड युज' टोयलेट योजना राबविण्यात यावी, अशी सूचना त्यांनी आयुक्तांना केली.
