पंचायत राज व्यवस्थेचे विकेंद्रीकरण : महाराष्ट्राचा देशात द्वितीय क्रमांक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पंचायत राज व्यवस्थेचे विकेंद्रीकरण : महाराष्ट्राचा देशात द्वितीय क्रमांक

Share This
मुंबई : शासनाच्या योजना ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पंचायत राज व्यवस्थेचे प्रभावी विकेंद्रीकरण केल्याबद्दल महाराष्ट्राला देशपातळीवरचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने उत्कृष्ट काम करून हे यश साध्य केले आहे. येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास करण्याच्या दृष्टीने पंचायत राज व्यवस्थेला स्वायत्तता देऊन त्यांना अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी केंद्राने विकेंद्रीकरणाचे धोरण अवलंबून प्रत्येक राज्याचे मुल्यमापन एका पाहणीद्वारे केले होते. देशातील जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विकासाच्या अनुषंगाने इतर विभागातील 14 विषयाशी संबंधित 105 योजना पंचायत राज संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करून राज्यातील 351 पंचायत समित्यांना बळकट करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पंकजा मुंडे यांनी विभागाला दिले आहेत. केरळ प्रमाणे महाराष्ट्रातील ग्राम पंचायतीसुद्धा मजबूत होणे आवश्यक असून त्यादृष्टीने आगामी काळात पाऊले उचलली जातील, असेही त्यांनी म्हटले आहे. 
यावर्षी महाराष्ट्राने चौथ्या स्थानावरून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. केरळने पहिला क्रमांक पटकावला आहे. येत्या रविवारी 24 एप्रिल रोजी जमशेदपूर (झारखंड) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या पुरस्काराचे वितरण होणार असून पंकजा मुंडे पुरस्कार स्वीकारण्यासाठी रविवारी जाणार आहेत.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages