मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या शाळाना राज्य सरकारकडून अनुदान मिळत नाही अशी बोंब मारली जात असताना पालिका योग्य प्रकारे आणि योग्य मार्गाने प्रस्तावाच पाठवत नसल्याने अनुदान मिळत नसल्याचा मुद्दा शिवनाथ दराडे यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत उपस्थित केला.
महानगरपालिकेच्या शाळाना राज्य सरकार अनुदान देत नाही असे पालिका प्रशासन सांगत होते. मागील वर्षी शिक्षण समितीमधे याबाबत मुद्दा उपस्थित झाल्यावर एप्रिल 2015 मधे याबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले होते. शिक्षण विभागाने याबाबत तब्बल 11 महिन्यानी प्रस्ताव सादर केला परंतू राज्य सरकारने पालिका आयुक्त अजोय मेहता याना पत्र पाठवून अनुदानाबाबतचे प्रस्ताव पाठवताना योग्य प्रकारे आणि योग्य मार्गाने पाठवल्यास अनुदान लवकरात लवकर देता येईल असे म्हटले आहे.
राज्य सरकार अनुदान देण्यास तयार असताना पालिका योग्य प्रकारे प्रस्ताव पाठवत नसल्याने अनुदान मिळत नसल्याचे दराडे यांनी शिक्षण समितीच्या निदर्शनास आणले आहे. पालिकेने योग्य प्रकारे प्रस्ताव सादर न केल्याने 42 खाजगी अनुदानित शाळांचे अनुदान दोन वर्षांपासून रखडले आहे. यामधे 26 मराठी शाळा असल्याचे दराडे यानी सांगितले. याबाबत प्रशासनाला कोणताही खुलासा करता आला नसल्याने सदर हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्षा हेमांगी वरळीकर यांनी दिले आहेत


No comments:
Post a Comment