मुंबई - दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या संघटनेचा नेता कन्हैयाकुमार डाॅक्टर होण्यास निघाला आहे, मात्र देश तोडण्याची वल्गना करणाऱ्या देशद्रोही कन्हैयाच्या हातून रोग्यांची कसली सेवा होणार आहे?’ असा चमत्कारिक सवाल हिंदू संघटनांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत उपस्थित करत आपली बौद्धिक दिवाळखोरी उघड केली.
या संघटनांच्या अजब सवालानंतर पत्रकारांनी वीर सेनेचे अध्यक्ष निरंजन पाल यांना कन्हैया वैद्यकीयचे शिक्षण घेत नसून तो सामाजिक शास्त्रात पीएच. डी. करत असल्याचे लक्षात आणून दिले. तरीसुद्धा पाल आपल्या विधानावर ठाम राहिले. ‘पण, कन्हैया एकदा डाॅक्टर झाला की त्याच्याकडे पेशंट तर येणारच, मग त्यांना तो तपासणारच की’, असे स्पष्टीकरण देत राहिले.
कन्हैयाला धमकी
कन्हैयाने मुंबईत येऊन वातावरण बिघडवू नये. त्याने शनिवारी मुंबईत भाषण दिल्यास तसेच नरेंद्र मोदी व संघ यांच्यावर टीका केल्यास तो धडधाकट परत जाऊ शकणार नाही, असा इशारा स्वराज्य हिंदू राष्ट्र संघटनेचे अध्यक्ष सुशील त्रिवेदी यांनी दिला.
वरळी ऐवजी चेंबूर
आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेने कन्हैया कुमार यांच्या भाषणाचे शनिवारी वरळी येथे आयोजन केले हाेते. पोलिसांनी अचानक गुरुवारी कार्यक्रम स्थळात बदल करण्यास भाग पाडले. त्यामुळे शनिवारचा हा नियाेजित कार्यक्रम चेंबूर येथील टिळक आदर्श विद्यालयात होणार आहे.


No comments:
Post a Comment