मुंबई, दि. 6 : स्वच्छ भारत अभियानाचे रुपांतर लोकचळवळीत होण्यासाठी या अभियानाशी संबंधित अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन ‘मिशन मोड’वर काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी, अमृत सिटी योजनांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत बीकेसी येथील एमएमआरडीएच्या कार्यालयात घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी केंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव राजीव गौबा, अतिरिक्त सचिव समीर शर्मा, राज्यातील नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, केंद्रीय नगरविकास विभागाचे सहसचिव नीरज मंडलोई, प्रवीण प्रकाश यांचेसह विविध महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ भारत अभियान हा पंतप्रधानांचा महत्वपूर्ण उपक्रम असून ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘अमृत सिटी’ साठी राज्याला केंद्राचे चांगले सहकार्य लाभत आहे. त्यामुळे या अभियानाशी संबंधित यंत्रणांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन मिशनमोडवर कामे केली पाहिजे. मात्र, या अभियानाच्या कामांचे उद्दिष्ट गाठताना त्या कामांच्या गुणवत्तेकडेही लक्ष दिले पाहिजे. राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविताना या अभियानाचे लोकचळवळीत रुपांतर होणे आवश्यक असून यामध्ये विविध संस्था, लोकप्रतिनिधी आणि शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचऱ्याचे वर्गीकरण, वाहतूक आणि प्रक्रियेबरोबरच सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न होणे आवश्यक असून त्यादृष्टीने महानगरपालिकांनी नियोजन करावे. आतापर्यंत राज्यातील 20 शहरे संपूर्ण हागणदारीमुक्त झाली असून 38 शहरांनी हागणदारी मुक्तीच्या दिशेने काम सुरु केले आहे. 31 डिसेंबर 2016 पर्यंत राज्यातील 100 शहरे हागणदारीमुक्त होण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात मार्च 2017 पर्यंत 4 लाख 50 हजार वैयक्तिक शौचालये बांधण्यात येणार असून त्यापैकी 1 लाख 99 हजार 282 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून 2 लाख 70 हजार शौचालयांचे बांधकाम सुरु आहे. यासाठी या अर्थिक वर्षात 261.84 कोटी रुपयांचा निधीची तरतुद करण्यात आली आहे. त्याचबरोबर अमृत योजनेतंर्गत मार्च 2017 पर्यंत 22 हजार सार्वजनिक शौचालयांचे उद्दिष्ट असून त्यापैकी 3467 शौचालयांचे काम पूर्ण झाले असून 6072 शौचालयांचे काम सुरु आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून 35 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच मार्च 2017 पर्यंत 11 हजार मे. टन कचऱ्याचे संकलन आणि वाहतुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील 561 वार्डात डोअर टू डोअर कचऱ्याचे संकलन करण्यात येत असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
अभियानाला जनआंदोलनाचे स्वरुप द्यावे – नायडू
महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. ते स्वच्छतेत अव्वल राहण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. तसेच मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. या शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य देणे आवश्यक असून त्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी स्वच्छ अभियानाला जनआंदोलनाचे स्वरुप द्यावे. या अभियानात मुलांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी यावेळी उपस्थितांना केले.

No comments:
Post a Comment