मुंबई, दि. 9 : मुंबई हे भारताचे आर्थिक उर्जा केंद्र असून शांघायच्या सहकार्याने मुंबईला आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र बनविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ताजमहाल हॉटेलमध्ये कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय), शांघाय म्युन्सिपल कमिशन ऑफ कॉमर्स (एसएमसीसी) शांघाय म्युन्सिपल फायनान्सियल सर्व्हिस ऑफिस (एसएमएफएसओ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चीन आणि भारत : विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन, आर्थिक आणि माहिती तंत्रज्ञान सेवांची सक्षम भागीदारी या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते.
यावेळी सीपीसी शांघाय म्युन्सिपल कमिटीचे पार्टी सेक्रेटरी हान झेंग, सीआयआयचे अध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्स, सीआयआयच्या तंत्रज्ञान कमिटीचे चेअरमन डॉ. गोपीचंद कातरागड्डा, ई बायोटेक कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. बुडी मो, इन्फोसिस टेक्नोलॉजी (चायना) कं. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रंगराजन वेलामोर, सायलिंग कॅपिटल चे अध्यक्ष लुई झियाडाँग, न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष के. व्ही. कामत,एसएमसीसीचे व्हाईस चेअरमन गू जुन आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, भारतात गुंतवणुकीच्या अनेक संधी आहेत. भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण मोठे व पायाभूत सुविधा उत्तम आहेत. नागरी भागाच्या विकासासाठी शासनाकडून राबविण्यात येणारे स्मार्ट सिटी अभियान जागतिक तंत्रज्ञानाच्या संधींना दार खुले करणारे ठरेल. स्मार्ट सिटीत गुंतवणूक करण्यासाठी आम्ही जगभरातील तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा निर्माण करीत आहोत. यासाठी यावर्षी 15 बिलीयन डॉलरची तरतूद करण्यात आली आहे. पाण्याचा पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया अशा विविध कामांमध्ये संधी आहे. नव्याने होत असलेल्या निर्माण कार्यामुळे येत्या दशकात महाराष्ट्र हे अधिक सक्षम व भक्कम राज्य बनणार आहे. मुंबई शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मेट्रो, रस्ते, पोर्ट, ट्रान्स हार्बर लिंक यासारखे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठी संधी असून चीनमधील कंपन्यांनी या व इतर क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. मुंबई शहराच्या विकासासाठी शांघायच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने वार्षिक विकास आराखडा तयार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईबरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये गुंवणुकीसाठी चीनमधील अनेक कंपन्या उत्सुक असल्याचे हान झेंग यांनी सांगितले. त्याचबरोबर मुंबईच्या पायाभूत सेवांमधील कामांमध्ये गुंतवणुकीबाबत सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी एसएमसीसी आणि सीआयआय, शांघाय आऊटसोर्सिंग प्रमोशन सेंटर आणि नॅसकॉम, ईबायोटेक कॉर्पोरेशन आणि एसबीआय जनरल इन्शुरन्स कं. लि. आणि बीयाँडसॉफ्ट (शांघाय) कं. लि. आणि इर्स्टन सॉफ्टवेअर सिस्टीम्स प्रा. लि. यांच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन, आर्थिक आणि माहिती तंत्रज्ञान सेवांबाबत सामंजस्य करार करण्यात आले.

No comments:
Post a Comment