मुंबई, दि. 24 Aug 2016 : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन रोखणे, रुपयाचा भाव वधारणे ही खरी देशभक्ती असल्याचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. त्यांच्या याच विचारांचा वारसा जतन करून व्यवहारात सुधारणा केल्यास समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचून त्यांच्या जीवनात आनंद आणता येईल, त्यांचे जीवनमान उंचावता येईल असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
गव्हर्नन्स नाऊ आणि सब टीव्ही समूहाच्यावतीने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या “इंडिया बँकिंग रिफॉर्म्स” या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमास रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस.एस. मुंद्रा, सब टीव्ही समूहाचे मार्कंड अधिकारी, गव्हर्नन्स नाऊचे कार्यकारी संचालक कैलाशनाथ अधिकारी, आयसीएआयचे अध्यक्ष सीएम देवराज रेड्डी, आयसीएसआय च्या अध्यक्ष ममता बिनानी आदी मान्यवर उपस्थित होते.
परिवर्तन हे प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असून काळासोबत बदलून सेवा दिल्यास, त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा, तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास अनेक अडचणींवर मात करता येऊ शकते, असे सांगून अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देश आणि राज्य अर्थव्यवस्थेसमोर आज अनेक आव्हाने आहेत. असे असले तरी जागतिक मंदीच्या काळात आपली वित्तीय व्यवस्था टिकून राहीली. अनेक खर्च असतानाही आपल्या मुलांच्या भविष्यासाठी पालकांकडून बँकांमध्ये बचतीच्या रुपात ठेवण्यात येणारी रक्कम हे त्यामागचे एक महत्वाचे कारण आहे. सुधारणा आणि संशोधन या दोन गोष्टींना खुप महत्व असल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, बँकांनी माहिती किंवा सांख्यिकीय आकडेवारीचे संकलन आणि विश्लेषण या गोष्टीकडे (डेटा कलेक्शन ॲण्ड ॲनॅलिसीसकडे) लक्ष द्यावे, कोण किती खर्च करतो, कोणत्या गोष्टींवर करतो, ते क्षेत्र काय आहे, त्याचे स्वरूप कसे आहे यासारखी माहिती संकलित केल्यास भविष्यकालीन दिशा निश्चित करण्यास मदत होईल.
एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नात देशातील मोठ्या 57 उद्योगसमूहांचा 25 टक्के वाटा आहे. मागील काही वर्षांत भांडवली गुंतवणूकीपेक्षा महसूली खर्चावर अधिक निधी खर्च झाला आहे. बँकांसमोर बुडित कर्जाचे आव्हान आहे. बांग्लादेशमध्ये बचतगटांच्या कर्ज परतफेडीचे प्रमाण 99.99 टक्के इतके आहे. त्याच्याही अभ्यास करण्याची गरज आहे. आपल्याला रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणाऱ्यांची संख्या वाढवायची आहे, असेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुधारणा ते संपूर्ण परितर्वन- बँकांचा प्रवास - गरज, अडचणी आणि आतापर्यंतचे यश याविषयावर आपली मत मांडली. बँकिंग क्षेत्रातील सुधारणा आज कुठल्या पातळीवर आहेत, तंत्रज्ञानाच्या बदलासह पायाभूत सुविधांचा विकास, कर्ज-ठेवीदारांच्या पातळीवरील सेवा, बँकिंगचे पारंपरिक व्यवस्था ते डिजिटल बँकिंग पर्यंतचे परिवर्तन, बँकिंग व्यवसाय आहे की सामाजिक दायित्व, बँकांचा बदलणारा ग्राहक, सेवेची गती, कुठेही, केव्हाही आणि कुठल्याही माध्यमातून गतिमान सेवेच्या उपलब्धतेची ग्राहकांची अपेक्षा यासारख्या विविध विषयांवर या चर्चासत्रात विचारमंथन झाले.
No comments:
Post a Comment