मद्याच्या तस्करीचे प्रमाण 8 टक्के आणि मुद्देमालात तब्बल 77 टक्क्यांनी वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मद्याच्या तस्करीचे प्रमाण 8 टक्के आणि मुद्देमालात तब्बल 77 टक्क्यांनी वाढ

Share This
मुंबई - महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2015 एप्रिल-डिसेंबर व त्याच कालावधीत 2016 मध्ये दिलेल्या माहितीनुसार रसायन, हातभट्टी दारू, देशी दारू, ताडी इत्यादी मद्याच्या अवैध तस्करीचा सुगावा लावला. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी छापे टाकून बेकायदेशीर मुद्देमाल जप्त केला. मुंबईत 2016 च्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत 295 गुन्हे पकडण्यात आले व त्यातून 54 लाख 16 हजार 925 रुपयांचा मुद्देमाल हाती लागला. या गुन्ह्यांतर्गत 302 आरोपींना अटक व 13 वाहने जप्त करण्यात आली. त्यातुलनेत 2015 मध्ये 272 गुन्ह्यांची नोंद होत 30 लाख 57 हजार 86 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला.

या सार्‍या प्रकरणांत 252 आरोपींना अटक झाली व 5 गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. यानुसार मुंबईत 2015च्या तुलनेत 2016मध्ये मद्याच्या तस्करीचे प्रमाण 8 टक्के आणि मुद्देमालात तब्बल 77 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर येत आहे.

याशिवाय उपनगरांतही मद्याचा अवैध साठा विविध ठिकाणावरून सापडला आहे. मात्र, मुंबईच्या तुलनेत उपनगरांत मद्याच्या बेकायदेशीर तस्करीत घट झाल्याचे समजते. 2016 एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत 718 गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला असून त्यातून सुमारे 1 कोटी 28 लाख 50 हजार एवढा मुद्देमाल हाती लागला. तसेच 708 आरोपींना अटक झाली व 20-25 गाड्या जप्त करण्यात आल्या.

त्या तुलनेत 2015 या कालावधीत 776 गुन्ह्यांचा छडा लावण्यात राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांना यश आले असून 74 लाख 67 हजार 583 रुपयांचा मुद्देमाल सापडला. यावेळी 734 आरोपींवर गुन्हे दाखल झाले; तसेच 22 गाड्यावर जप्ती आणली. या आकडेवारीनुसार उपनगरांत मद्याच्या तस्करीचे प्रमाण 7.2 ने कमी झाले आहे. याउलट जप्त मुद्देमालाची किंमत 72 टक्के अधिक आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages