मुंबई 1 Jan 2016 -
केबलमध्ये अडकलेल्या ससाण्याची सुटका करताना विजेचा धक्का बसून जखमी झालेले अग्निशमन दलाचे जवान राजेंद्र भोजने यांचे काल रात्री रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.
१० डिसेंबरला महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात केबलमध्ये अडकलेल्या पक्ष्याची सुटका करताना भोजने, संजय काळभेरे आणि दिनेश सबनकर या तिघा कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का लागला होता. त्यांच्यावर ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमधेये उपचार सुरू होते. अखेर काल (३१ डिसेंबर २०१६) त्यांचे निधन झाले. या अपघातात जखमी असलेले संजय काळभेरे आणि दिनेश सबनकर यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, भोजने यांच्या कुटुंबीयांनी भोजने यांना शहीदाचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण होईपर्यंत पार्थिव ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला होता. परंतू अग्निशमन दलातील फक्त अधिकाऱ्यांनाच शहिदांचा दर्जा देणाऱ्या पालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाने भोजने कुटुंबियांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर भोजने यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.