पालघर / 10 जानेवारी - गरीब आदिवासी कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी श्रमजीवी संघटना नेहमीच रस्त्यावरचा लढा लढताना सर्वांनीच पाहिली आहे, मात्र आता सरकारचाच एक भाग असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आता श्रमजीवी ने लढा पुकारला आहे. पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा वर्कर,सफाई कामगार, गट प्रवर्तक, वाहन चालक अशा सुमारे 15 हजार कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उद्या ( ता.११ ) अध्यक्ष विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवी कामगार संघटना जिल्हापरिषद कार्यालयावर धडकणार आहे.
श्रमजीवी संघटनेने कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आणला, त्यानंतर विवेक पंडित यांनी प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सरसकट सगळ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांना दोषी न धरता त्यांच्याही अडचणी आहेत हे संघटने समजून घेण्याची भूमिका घेतली. परिणामी खऱ्या अर्थाने तळागाळात काम करणाऱ्या या घटकांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे समोर आले. अत्यंत तुटपुंज मानधनात हे लोक काम करत असून त्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा आणि सुरक्षा नसल्याचे समोर आले, आता पर्यंत हे घटक विभागले होते आणि एकेकटे आपापल्या परीने लढत होते. मात्र सरकार दरबारी या घटकांची साधी दखल सुद्धा घेतली गेली नाही. आता सर्व घटकांच्या न्याय्य हक्काचा लढा उभारून श्रमजीवी कामगार संघटनेने या सर्वांना एकत्र आणले आहे. उद्या या घटकांच्या विविध मागण्यांसाठी पालघर जिल्हापरिषदेवर इशारा मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाचे नेतृत्व स्वतः विवेक पंडित करणार असल्याने या मोर्चाला विशेष महत्व प्राप्त झाले असून मोठ्या संख्येने उद्या श्रमजीवी सभासद धडकणार आहेत.