मुंबई : पालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ उतरणार असून जवळपास सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप कोणत्याही पक्षाने युतीबाबत विचारणा केलेली नाही. आतापर्यंत १९0 जागांची तयारी झाली आहे. आठवडाभरानंतर याबाबतचा निर्णय घेऊन उमेदवारी यादी केली जाईल, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश भारतीय यांनी दिली.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. यामध्ये भारिप बहुजन महासंघानेही १९0 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने युतीबाबत विचारणा केलेली नसल्याने डावे व त्यासारख्या छोट्या समविचारी घटक पक्षांना सोबत घेऊन भारिप निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मागील २0१२ च्या निवडणुकीत भारिपची फक्त एकच जागा निवडून आली होती. या वेळी जास्तीच जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न भारिप बहुजन महासंघाचा आहे. तशी स्थानिक पातळीवर तयारी सुरू आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले भाजपासोबत गेल्याने दलितांची मते फारसी त्यांच्या बाजूला वळणार नसल्याचे चित्र आहे. भाजपा-शिवसेना युती होईल की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दलितांची मते खेचण्यासाठी भाजप वगळता उर्वरित पक्ष भारिप बहुजन महासंघाशी युती करण्याची शक्यता आहे.