मुंबई ( प्रतिनिधी ) 20 Jan 2017 –
देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील कामत- निरुपम गटातील दुफळी पुन्हा उफाळून आली आहे. संजय निरुपम यांचा दृष्टीकोन नकारात्मक आहे, असा आरोप कामत यांनी केला असून उमेदवार निवड प्रक्रियेतून आपण बाहेर पडत आहोत असा मेसेज आपल्या समर्थकांना पाठवला आहे. त्यामुऴे उमेदवारी यादी जाहीर होण्यापूर्वीच कामत -निरुपम गटातील वाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे या निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी काँग्रेसमधील कामत - निरुपमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली झाली. तिकीट मिळावे यासाठी या दोन्ही गटातील समर्थकांचा प्रयत्न सुरू आहे. गटातटाचा परिणाम निवडणुकीवर होऊ नये यासाठी तिकीट वाटपासाठी काँग्रेसने समिती नियुक्त केली आहे. या समितीत कामतही आहेत. मात्र आपल्याला सतत डावलले जात असून निरुपम यांचा दृष्टीकोन नकारात्मक आहे, असे म्हणत कामत यांनी आपली नाराजी पुन्हा व्यक्त केली आहे. काही महिन्य़ांपूर्वी कामत यांनी काँग्रेसमधील अंतर्गत वादाला कंटाऴून राजीनामा देत समर्थकांसह मुंबई पक्ष कार्यालयासमोर जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. यामध्ये माजी आमदार, नगरसेवकांचा समावेश होता. शक्तीप्रदर्शनानंतर कामत व त्यांच्या समर्थकांची थेट दिल्लीतून नाराजी दूर करण्यात आली. मुंबई महापालिकेत काँग्रेसचे 52 नगरसेवक असून विरोधी पक्षनेता काँग्रेसचा आहे. यातील निम्मे म्हणजे जवळपास 25 नगरसेवक कामत गटाचे आहेत. गटातल्या वादानंतर निरुपम यांनी कामत गटाचे नगरसेवक देवेंद्र आंबेरकर यांना हटवून प्रवीण छेडा यांना विरोधीपक्ष नेत्याच्या खुर्चीत बसवले. त्यामुळे कामत गटात समर्थकांमध्ये अंतर्गत खदखद कायम राहीली. या गटातील दुफळीचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होऊ नये यासाठी पक्षश्रेष्टींचा प्रयत्न आहे. उमेदवार निवड प्रक्रिेयेच्या वेळी गटातील वाद पुन्हा बाहेर येऊ नय़े यासाठी काँग्रेसने समिती नियुक्ती केली. मात्र आपल्याला डावलले जाते आहे. निरुपम यांचा दृष्टीकोन नकारात्मक आहे अशी नाराजी कामत यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ऎन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजीतले राजकारण पुन्हा उफाळून आल्याचे चित्र आहे.
मुंबई काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष निझामुद्दीन राईन यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्यासोबत सुमारे 4700 सदस्यही राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. याबाबतची शनिवारी अधिकृत घोषणाही केली जाणार असल्याचे समजते.