मुंबई - पवई तलावात हाऊसबोट उलटून झालेल्या अपघातात तीन जणांना जीव गमवावा लागला. त्यानंतर मुंबई महापालिकेने या तलावात बोटींग करण्यास तसेच मासेमारी करण्यास मनाई केली. तरीही तलावात जाण्यापासून रोखल्याच्या कारणास्तव न्यूटन जोशवा या व्यक्तीने महाराष्ट्र स्टेट अँगलिंग असोसिएशनचा कर्मचारी इम्रान शेखला याला बेदम मारहाण केली. ही सर्व मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यावेळी न्यूटनने या कर्मचाऱ्याच्या अंगावर सोबत आणलेले कुत्रे सोडण्याचाही प्रयत्न केला.
न्यूटन हा या तलावात अनधिकृत हाऊसबोट चालवत होता आणि २३ डिसेंबरच्या रात्री जी दुर्घटना घडली ती हाऊसबोटही न्यूटन जोशवा याची असल्याने महाराष्ट्र अँगलिंग असोसिएशन न्यूटन जोशवा याचे सदस्यत्व रद्द केले होते. त्याचा रागही त्याच्या मनात होता. त्याचाच राग या कर्मचाऱ्यावर काढण्यात आला.
या मारहाणीनंतर अँगलिंग असोसिएशनच्या कार्यालयाचीही त्यांनी मोडतोड केल्याची तक्रार पवई पोलिसात आहे. परंतु ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्याचा गुन्हा मात्र स्वतंत्रपणे पवई पोलिसांनी नोंदवणे गरजेचे असतानाही गुन्हा नोंदवला नाही. पोलिसांवर येत असलेल्या दबावामुळेच मारहाणीचा गुन्हा नोंद केला जात नसल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. असोसिएशनचा पदाधिकारी असलेल्या जलालुद्दीन काझी यालाही न्यूटनने फोनद्वारे धमकी दिल्याची तक्रार पोलिसात आहे.
परंतु पोलीस त्याच्यावर कुठलीच कारवाई करताना दिसत नाही. धक्कादायक म्हणजे तीन जणांचा बळी घेणाऱ्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जावून त्यातील दोषींवर कारवाई करतानाही पोलीस दिसत नाही. पवई पोलीस कुणाच्या दबावाखाली बघ्याच्या भूमिकेत गेले आहे, दोषींवर कारवाई का केली जात नाही ?, असे प्रश्न याठिकाणी निर्माण होत आहे.