मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी पालिकेने बेस्ट उपक्रमाला उपनगरात विद्युत पुरवठा करण्याच्या योजनेसाठी दहा वर्षे बिनव्याजी अर्थसहाय्य करावे अशी ठरावाची सूचना काँग्रेसचे नगरसेवक अशरफ आझमी यांनी पालिका सभागृहात मांडली आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पावर स्थायी समितीत चर्चा सुरू असताना या पर्यायाचा विचार अर्थसंकल्पात होण्याची शक्यता असल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठा परिवहन उपक्रम म्हणून बेस्ट ओळखली जाते. सद्या हा उपक्रम आर्थिक संकटाशी सामना करीत आहे. बेस्टची तूट सहाशे कोटी रुपयांवर गेली आहे. बेस्टवर सुमारे 2 हजार 185 कोटी रुपये इतके कर्ज आहे. 1600 कोटी रुपये इतके कर्ज बेस्टला पालिकेने दिले आहे. बस खरेदीसाठी बेस्टला शंभर कोटी रुपये दिले आहे. त्यातून खरेदी केलेल्या अत्याधुनिक बसचे उद्घाटन नुकतेच शिवसेनेच्या युवा सेनेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. बेस्टला संकटातून बाहेर काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र संकटात असलेल्या बेस्टला वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत. पालिकेच्या अर्थसंकल्पावर सद्या चर्चा सुरू असून बेस्टला वाचविण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद होईल काय, असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. सपाचे नगरसेवक अशरफ आझमी यांनी ठरावाची सुचना मांडून पालिकेने बेस्टला दहा वर्षासाठी बिनव्याजी अर्थसहाय्य करण्याची मागणी एका ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे. उपनगरामध्ये विद्युत पुरवठा करण्यासाठी योजना तयार करावी तसेच या योजनेसाठी पालिकेने अर्थसहाय्य करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. पालिकेने मदत केल्यास बेस्ट उपक्रमाची आर्थिक बाजू सक्षम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.