मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी असलेल्या बीडीडी चाळींच्या प्रकल्पाचे ई भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. या योजनेअंतर्गत रहिवाशांचे दोन वर्षात पूनर्वसन करण्याची योजना सरकारने तयार केली आहे. त्याच धर्तीवर आता मुंबईत असलेल्या मोठ्या झोपडपट्ट्यांच्या पूनर्वसनाची योजना राबविण्यात यावी अशी मागणी एका ठरावाच्या सुचनेद्वारे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत आहे. या मुंबापुरीत लोकांना परवडणारी घरे मिळत नाहीत. घरांच्या किंमती सामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. त्यामुळे मोकळी जागा दिसेल तेथे पालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार तसेच खासगी जमीनीवर मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत. नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या इमारतींची पूनर्विकास योजनेचे भूमीपूजन नुकतेच करण्यात आले. मुंबई शहरातील जुन्या चाळी, निवासी वसाहती यांचा पूनर्विकास होत असताना शहर आणि उपनगरातील झोपडपट्ट्यांचा पूनर्वसनाद्वारे विकास होताना दिसत नाही. त्यामुळे बीडीडी चाळींच्या धर्तीवर मुंबईतील मोठ्या झोपडपट्ट्यांसाठीही ही योजना राबवावी अशी मागणी चेंबूरकर यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धारावीची पूनर्विकास योजनाही रखडली आहे धारावीपाठोपाठ धारावीशी स्पर्धा करणारी शिवाजी नगर झोपडपट्टी मुंबईतील मोठी झोपडपट्टी आहे. मुंबईत अशा सुमारे वीस मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. त्यांच्या विकासासाठी विकासकांच्या उड्या पडल्या आहेत. मात्र पूूनर्विकासाच्या योजना मार्गी लागत नाहीत. त्यामुळे या योजना सरकारने ठेकेदार नेमून योजना यशस्वी कराव्यात अशी मागणी आता रहिवाशी करू लागले असून यासाठी पालिकनेही अनुकूलता दर्शविली आहे.