मुंबई / अजेयकुमार जाधव -
मुंबई महानगरपालिकेने गोवंडी रफिक नगर नाल्याचे काम दिलेल्या आर.ई.इंफ्रा या कंत्राटदाराने नाल्याच्या कामावेळी बेकायदेशीररित्या नाल्यात माती व चिखल आणून टाकला. नंतर तीच माती आणि चिखल इतर नाले सफाई करणाऱ्या कंत्राटदारांना विकली. या प्रकरणी आरटीआय कार्यकर्ते जाहिद शेख यांनी केलेल्या लेखी तक्रारीनंतर मीडियामधून याबाबत येणाऱ्या बातम्यांमुळे महानगर पालिका व जिल्हाधिकारी कार्यालय तसेच वन विभागाने आर. ई. इंफ्रावर नियम व कायद्यानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
आर. ई. इंफ्रा या कंत्राटदाराला रफीक नगर, बैंगणवाडी, बाप हेरिटेज, ज्ञानसाधना हायस्कुल नाल्याच्या बाजूने संरक्षण भिंत बांधणे, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे काम देण्यात आले. नाल्याचे काम करताना नाल्याचे पाणी अडवण्यासाठी मुंबईमधील बिल्डरांच्या कामाच्या ठिकाणची माती आणि चिखल आर. ई. इन्फ्रा. या कंत्राटदाराने प्रति गाडी २३०० ते २५०० रुपये घेऊन तब्बल १०७०४ ट्रिप गाड्या रफीक नगर नाल्यात टाकली. यासाठी महानगरपालिकेकडून सी अँड डी ची परवानगी घेतली नव्हती. बेकायदेशीर माती आणि चिखल टाकल्या प्रकरणी प्रति गाडी क्लीन अप दंड म्हणून २० हजार रुपये आकारण्यात येतो. तसेच आर ई ने महापालिकेची सी अँड डी ची परवानगी घेतली नव्हती. यामुळे प्रतिगाडी ४० हजार रुपये प्रमाणे १०७०४ गाड्यांचा ४२ करोड ८१ लाख ६० हजार रुपये इतका अंदाजित दंड वसूल करण्याची प्रक्रियास सुरु झाल्याची माहिती जाहिद शेख यांनी दिली.
त्याच प्रमाणे वन व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आर. ई. इंफ्राने कोणतीही परवानगी न घेता गौण खनिजांचे उत्खनन करून त्याची विक्री केली आहे. तसेच नाल्यामध्ये असलेल्या तिवरांच्या झाडांची तोड केली आहे. या प्रकरणी वन विभागाकडून व मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. १०७०४ गाड्यांमध्ये प्रति गाडी ४ ब्रास या प्रमाणे ४२८१६ ब्रास गौन खनिजांचे बेकायदेशीर उत्खनन केल्याने ११३२ रुपये प्रति ब्रास दंड व गौण खनिजांचे स्वामित्वधन तसेच इतर दंड म्हणून तब्बल १० कोटी रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. तसेच बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन व तिवरांच्या झाडांची कत्तल या प्रकरणी नियमानुसर आर. ई. इंफ्रा आपल्या कामासाठी वापरात असलेल्या सर्व गाड्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जप्त केल्या जाणार असल्याचे आश्वासन दिल्याचे जाहिद शेख यांनी सांगितले.