मुंबई - दिंडोशी विधानसभेतील जन. अरुणकुमार वैद्य मार्गावरील नागरी निवारा व गोरेगाव चित्रनगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रत्नागिरी हॉटेल येथे वाहतूक चौक नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या, तसेच तेथे असलेले पेव्हर ब्लॉक तुटून पावसाळ्यात खड्डे पडण्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता त्यामुळे येथे एक वाहतूक चौक असावा अशी मागणी स्थानिक आमदार सुनिल प्रभु यांच्याकडे नागरिकांनी केली. नागरिकांच्या या मागणीचा पाठपुरावा आमदार सुनिल प्रभु यांच्यासह तत्कालीन नगरसेविका मनीषा सदाशिव पाटील तसेच विद्यमान नगरसेवक विधिसमिती अध्यक्ष सुहास वाडकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केला.
त्यानुसार सिग्नल बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली व सदर वाहतूक चौक मास्टीक पद्धतीने करण्याबाबत विशेष बाब म्हणून खास आर्थिक तरतूद करण्यासाठी मागील वर्षी पावसाळ्यात खड्डे पडून जनतेला होणाऱ्या त्रासाची माहिती व्हावी व मास्टीक पद्धतीने करण्याची गरज काय आहे याची देखील माहिती होण्यासाठी आमदार सुनिल प्रभु यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख व शिवसेना नगरसेवक यांच्यासह या ठिकाणचा पाहणी दौरा केला आणि अतिरिक्त आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनाकडून खासबाब म्हणून मास्टीक पद्धतीने वाहतूक चौक करण्याची परवानगी घेऊन त्यानुसार ६५ x ४५ एवढा मोठा सिमेंट ट्रीटेड बेस कोर्ट पद्धतीचा वापर करत वाहतूक सिग्नलसह वाहतुक चौक बनविण्यात आला असून या वाहतूक चौकाचे लोकार्पण आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते आज झाले.
या वाहतूक चौकामुळे रत्नागिरी हॉटेल येथे होणारी वाहतूक कोंडी फुटणार असून जनतेला पावसाळ्या आधी खड्डेमुक्त रस्ता उपलब्ध झाला आहे. तसेच हा वाहतुक चौक बनवत असताना खालून महानगर गॅसची पाईप लाईन घेण्यात आली असून याचा फायदा आजूबाजूला असणाऱ्या सामना परिवार, सन राईज या सारख्या इतर गृहनिर्माण संस्थांना होणार आहे.
सदर काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता दराडे यांच्या सह उप प्रमुख अभियंता माडीवाले, कार्यकारी अभियंता सावंत, सहाय्यक अभियंता आहुजा, उप अभियंता आघाव, कुलकर्णी देवरूखकर यांनी अथक मेहनत घेतली त्यामुळे हे अद्ययावत असा वाहतूक चौक लवकरात लवकर बनल्याचे आमदार प्रभु यांनी म्हटले
यावेळी विधी समिती अध्यक्ष सुहास वाडकर, स्थापत्य समिती उपनगर तुळशीम शिंदे, माजी नगरसेवक चंद्रकांत वाडकर, सदाशिव पाटील, शाखा प्रमुख संदीप जाधव यांच्या सह असंख्य शिवसैनिक व नागरिक उपस्थितीत होते