अन्याय अत्याचाराच्या मुकाबल्यासाठी महाराष्ट्रात भीम आर्मीची स्थापना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अन्याय अत्याचाराच्या मुकाबल्यासाठी महाराष्ट्रात भीम आर्मीची स्थापना

Share This

मुंबई / अजेयकुमार जाधव -
उत्तर प्रदेशात सहारणपूर येथे दलितांवर झालेल्या अत्याचारा विरोधात भीम आर्मी हि संघटना अस्तित्वात आली. आज रविवारी चैत्यभूमी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून भीम आर्मीची महाराष्ट्रात स्थापना करण्यात आली. यावेळी भीम आर्मीचे केंद्रीय प्रसार आणि प्रचार प्रमुख राकेश यादव उर्फ राकेश भीम, मध्यप्रदेशमधील दत्ता मेढे आवर्जून उपस्थित होते.

महाराष्ट्रासह देशभरात दलित आणि अल्पसंख्यांक समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहेत. या अन्याय अत्याचाराला जशास तसे उत्तर देता यावे म्हणून दलित पँथर सारख्या संघटना असावी अशी मागणी जनतेकडून गेले अनेक वर्षे केली जात आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशात भाजपाचे योगी मुख्यमंत्री बनल्यानंतर सहारणपूर येथे दलितांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करण्यात आले. या अन्याय अत्याचाराच्या विरोधात पेशाने वकील असलेल्या चंद्रशेखर आझाद (रावण) याने भीम आर्मी नावाची संघटना उभी करून अन्याय अत्याचार करणाऱ्यांना जशासतशे उत्तर दिले. तसेच दिल्लीला धडक देऊन तीव्र आंदोलन छेडले.

सहारणपूर प्रमाणेच महाराष्ट्रातही दलितांवर अन्याय अत्याचार अनेक ठिकाणी होत आहेत. या अन्याय अत्याचार करणाऱ्याना चोख उत्तर देण्यासाठी भीम आर्मीची महाराष्ट्रात स्थापना करण्यात आली. रविवारी एकीकडे भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना बघण्यात लोक व्यस्थ असताना शेकडो आंबेडकरी तरुण आणि महिलांच्या उपस्थितीत भीम आर्मीची स्थापन करण्यात आली. भीम आर्मीच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी अशोक कांबळे, मुंबई अध्यक्षपदी ऍडव्होकेट रत्नाकर डावरे, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भीम आर्मी हि संघटना राज्य सरकार व पोलीस प्रशासनावर वाचक ठेवायचे काम करणार आहे. कायद्याने अन्याय अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास नंतर मात्र संबंधितांना आंबेडकरी दणका द्यायला मते पुढे पाहणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

भीम आर्मीच्या स्थापनेला पाठिंबा देण्यासाठी आणि भीम आर्मीमध्ये सामील होण्यासाठी राज्यभरातून शेकडो तरुण चैत्यभूमी येथे जमले होते. यात पुणे येथील सूर्यकांत सुर्वे, सांगली येथील विजय कांबळे यासारख्या तरुणांनी आपल्या साथीदारांसह भीम आर्मीत प्रवेश केला. तर भीम आर्मीला पाठिंबा देण्यासाठी संपादक कुंदन गोटे, नितीन मोरे यांनी आपली उपस्थिती लावली होती. भीम आर्मीच्या स्थापना कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेखर कांबळे, रमेश बालेश यांनी मेहनत घेतली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages