मुंबई / प्रतिनिधी -
बेस्ट उपक्रमामधील बसला एखाद्या दुसऱ्या खाजगी वाहनाने अपघात केला तरी बेस्टच्या वाहकावरच कारवाई केली जात असल्याचा प्रकार आज बेस्ट समितीत समोर आल्यावर या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी प्राशासनाला दिले.
खाजगी वाहनांकडून बेस्टच्या बसला अपघात केल्यावर वाहने व मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या १५ त्रयस्थ पक्षकारांनी दाव्यामध्ये तडजोड न केल्याने त्यांच्या विरुद्ध कायदेवशीर कारवाई करण्याचा प्रस्ताव समिती समोर सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलताना शिवसेनेचे सदस्य राजेश कुसळे यांनी बेस्ट प्रशासन बसला एखाद्याने अपघात केल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करते तसेच आपल्या चालकाचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करते. प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावामध्येच अशी कारवाई केल्याचे नोंद असल्याचे कुसळे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले. आपल्याकडे आणखी अशी १५ प्रकरणे आहेत ज्यामध्ये बस उभी असताना मागून येणाऱ्या वाहनाने बेसला अपघात झाला आहे. तरीही बेस्ट चालकाला दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणाची यादी बेस्ट अध्यक्षांना सादर करत कुसळे यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. यावर मनसेचे दत्ता नरवणकर यांनी अश्या प्रकारे कारवाई करणे म्हणजे कामगारांवर अन्याय असल्याचे सांगितले. तर सुहास सामंत यांनी आपल्याकडे अशी १५० प्रकरणे आहेत. हि प्रकरणे मी पुढील समितीच्या बैठकीत सादर करतो. या प्रकारांची चौकशी करण्याचे आव्हान प्रशासनाने स्वीकारावे अशी मागणी केली. यावर सदर प्रकार हा गंभीर असल्याने याची दाखल घेत प्रस्ताव राखून ठेवत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिले.