
आंबेडकरी संघटनांमध्ये संतापाची लाट -
मुंबई । अजेयकुमार जाधव 12 Nov 2017 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त दरवर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सोयी सुविधा पुरण्यात येतात. त्यासाठी दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महरिनिर्वाण दिन समन्वय समिती व आंबेडकरी संघटनांच्या बैठका आयोजित करण्यात येतात. यावर्षी मात्र महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ( 10 नोव्हेंबर) संपन्न झालेल्या बैठकीला आंबेडकरी समाजातील संघटनाना मुद्दाम डावलण्यात आल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष व कामगार नेते रमेश जाधव यांनी केला आहे. आंबेडकरी संघटनांना बैठकीपासून डावलण्यात आल्याने संतापाची लाट पसरली असून त्याचा आम्ही संबंधितांना जाब विचारू असा इशारा जाधव यांनी दिला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त दादर चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात विविध सेवा-सुविधा पालिकेकडून पुरवण्यात येतात. यात लांबून आलेल्या भीम अनुयायांसाठी मंडपाची व्यवस्था, भन्तेजींसाठी निवासाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, माहिती कक्ष, निरीक्षण मनोरे, रुग्णवाहिकेसहीत सुसज्ज आरोग्य सेवा, शौचालये, पुस्तके व इतर साहित्य विकण्यासाठी स्टॉल्स, आंघोळीसाठी बाथरूम इत्यादी सुविधा पुरवण्यात येतात. या सुविधा पुरवताना आंबेडकरी संघटनांना आपल्या सूचना देता याव्यात म्हणून महापालिकेच्या जी नॉर्थचे सहाय्यक आयुक्त, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त, पालिका आयुक्त व महापौर यांच्याकडे बैठका आयोजित करण्यात येतात. शुक्रवारी अशीच बैठक पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आंबेडकरी संघटनाना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रणच दिले नसल्याचे जाधव यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, समता सैनिक दल इत्यादी अनेक संघटनांना आयुक्तांच्या बैठकीपासून अलिप्त ठेवण्यात आले आहे. विशेष करून भारतीय बौद्ध महासभा हि संघटना वर्षभर चैत्यभूमीचे व्यवस्थापन करते. या संघटनेच्या देशभरात हजारो शाखा आहेत. बौद्धजन पंचायत समिती हि संघटना कोंकणातील मुंबईमध्ये स्थायिक असलेल्या बौद्धांचे नेतृत्व करते. कोंकणातील बौद्धांची संख्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात असून या संघटनेच्या मुंबईत 800 हुन अधिक शाखा आहेत. या संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर आहेत, त्यांनाही या बैठकीची माहिती देण्यात आलेली नाही. आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना या संघटनेलाही बैठकीची माहिती देण्यात आलेली नाही. समता सैनिक दलाचे 4 ते 5 हजार स्वयंसेवक महापरिनिर्वाण दिनी तीन ते चार दिवस 25 लाखाहून अधिक येणाऱ्या भीम अनुयायांचे व्यवस्थापन व नियोजन करत असतात. तीन ते चार दिवस लाखो अनुयायांचे शिस्तबद्ध नियोजन करणाऱ्या संघटनेलाही बैठकीची माहिती देण्यात आली नसल्याचे जाधव यांनी सांगितले.
आंबेडकरी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या अश्या संघटनांना अतिरिक्त आयुक्तांकडे होणारी बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले. तर पालिका आयुक्तांकडे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीची माहिती देण्यात आलेली नाही. पालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडून आंबेडकरी संघटनाना अश्या बैठका कळविण्यात येतात. मात्र यावेळी जी नॉर्थ विभागाकडून बैठकांची माहिती लपवून आंबेडकरी संघटनांना डावलण्याचे कारस्थान करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. याबाबत या सर्व संघटनांमध्ये महापालिकेविरोधात नाराजी पसरली आहे. महापालिकेच्या संबंधित सहाय्यक आयुक्तांनी केलेला या प्रकाराचा रिपब्लिकन सेनेने निषेध केला आहे. तसेच पालिकेच्या एका वॉर्डकडून असा प्रकार झाला असल्याने याबाबत सहाय्यक आयुक्तांना जाब विचारू असा इशारा जाधव यांनी दिला आहे. दरम्यान याबाबत महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही.